कोल्हापूर : चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा खून करून नंतर दोन मुलांचा खून केल्याचा प्रकार कागल शहरात उघडकीस आला आहे. हा गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी पती प्रकाश बाळासो माळी (वय ४२) याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शांत डोक्याने त्याने कुटुंबातील सर्वांची हत्या केली. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
सदरची घटना ही येथील काळम्मावाडी वसाहती जवळील घरकुलमध्ये काल दुपारी दोन वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, आरोपी प्रकाश माळी हा कागल शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलमध्ये पत्नी, मुलगा व मुलीसह राहतो. पत्नी कुणाशीतरी फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरून प्रकाशने पत्नी गायत्री (वय ३७) वाद घालून गळा आवळून खून केला.
सायंकाळी शाळेतुन घरी परत आलेला मुलगा कृष्णात (वय १३) याने पप्पा असे का केले? असे विचारले. त्यावर आपल्यानंतर मुलांचा सांभाळ कोण करणार? या शंकेने प्रकाशने त्याचाही दोरीने गळा आवळून ठार मारले. रात्री आठच्या सुमारास बाहेर गेलेली अकरावीत शिकणारी मुलगी अदिती (वय १७) ही घरी आली. ती दंगा करणार हे लक्षात घेऊन तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. ती आरडाओरड करत होती. प्रकाशने तिच्या डोक्यात दगडी वरवंटा मारला व त्यानंतर गळावरून खून केला.
प्रकाश हा हमीदवाडा साखर कारखान्यात कामगार होता. त्याची पत्नी गायत्री याचे बरोबर नेहमी वाद होत असे. पत्नी मुलांना वारंवार मारते या कारणातून त्याने पत्नीचा खून केला असे समजते. या तिहेरी हत्याकांडामुळे मोठी खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही घटना समजतात पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे हे घटनास्थळी तातडीने हजर झाले. त्यांनी फ्लॉरंसिक लॅबच्या तज्ञांना पाचारण केले.