“शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करत आहे” : प्रवीण दरेकर
मुंबई : राज्य सरकार फक्त घोषणा करतं, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यांच्या करणी आणि कथनीमध्ये फरक असून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे सरकार करत आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
अतिवृष्टीच्याबाबतीत आम्ही दौरे केले पाहणी केली. सरकारवर दबाव आणला. सरकारने मोठ्या थाटात १० हजार कोटींचे घोषणा केली. दिवाळी अगोदर २ हजार कोटी देऊ असं काही सांगितलं. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दिलासा नाही. पाच पैसे त्याच्या खात्यात जमा झालेले नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचं काम हे ठाकरे सरकार करत आहे. यांची करणी आणि कथनीमध्ये फरक आहे. दहा हजार कोटींपैकी २ हजार कोटी तर द्याच, परंतु दहा हजार कोटी अपुरे आहेत. तात्काळ यामध्ये वाढ करून १० हजार कोटींच वितरण होईल, याची शासनाने दक्षात घ्यावी.” असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यंत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी २ हजार २९७ कोटी रुपयांचा निधी दिवाळीआधी वितरित करण्यात येणार असल्याची, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र ही मदत अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नसल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केलेला आहे.