राज्यपाल नियुक्त आमदारकीची 'ती' १२ नावे अजूनही गुलदस्त्यात
मुंबई : राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कला, साहित्य, समाजसेवा आणि सहकार या क्षेत्रांशी संबंधित १२ व्यक्तींची महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रत्येकी ४ नावांची शिफारस करायची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही १२ नावे चर्चेअंती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात या नावांत आयत्यावेळी बदल करण्याचे धोरण तिन्ही पक्षांनी अवलंबले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सोमवारी ही यादी राज्यपालांकडे पाठवली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी प्रत्येक नावावर सखोलपणे विचार करण्यात येत आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी आवश्यक निकषांच्या अनुषंगाने कोणतीही त्रुटी राहू नये याची काळजी घेण्यात येत आहे. शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हे एक नाव निश्चित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर आता सावरकरप्रेमी अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव अचानक चर्चेत आले आहे. मात्र पोंक्षे यांनी मला याबाबत अद्याप शिवसेनेकडून कोणतीही विचारणा करण्यात आलेली नाही, असे माध्यमांना सांगितले. दुसरीकडे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनीही त्यास दुजोरा दिला नाही. मुख्यमंत्री जर कुणाशी बोलत असतील तर त्यावर अशा पद्धतीने चर्चा करणे योग्य नाही, असे राऊत म्हणाले.
मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी अभिनेत्री रेणुका शहाणे यांना विधान परिषदेवर पाठवण्याची मागणी टवीटरच्या माध्यमातून केली. काँग्रेस नेते राहुल गांधी, एच. के. पाटील व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना टॅग करत त्यांनी ही मागणी केली. रेणुका शहाणे या समाजभान जपणाऱ्या अभिनेत्री आहेत. अनेक मुद्द्यांवर त्या अभ्यासपूर्ण आणि परखड भाष्य करत असतात. कंगना राणावत प्रकरणातही त्यांनी सडेतोडपणे भूमिका मांडली होती. भाजपच्या आयटी सेलला फैलावर घेतानाच खरी तुकडे तुकडे गँग तुमचा आयटी सेल आहे, असे रेणुका शहाणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टिवटरच्या माध्यमातून थेट शब्दांत सांगितले होते.
जिथे मोठमोठे नेते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात तिथे रेणुका शहाणे निर्भीडपणे व्यक्त होतात. अशा व्यक्तीला विधान परिषदेवर पाठवून न्याय द्यावा, अशी विनंती जुन्नरकर यांनी केली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस