Type Here to Get Search Results !

संपादकीय : चंद्रकांतदादा काय ते खरं हाय का....?


संपादकीय : चंद्रकांतदादा काय ते खरं हाय का....?
आशिया खंडातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबई मधील धारावी मध्ये जेव्हा कोरोनाच्या विषाणूंनी प्रवेश केल्याची बातमी समजली, तेव्हा मात्र सर्व महाराष्ट्रासह देशातील जनतेची धाकधूक अधिक गतीने वाढली होती. कारण धारावीच्या झोपडपट्टी मधील छोट्या-छोट्या घरांची गर्दी,  दहा बाय दहा आकाराच्या एका घरामध्ये आठ ते दहा लोकांचा रहिवास,  झोपडपट्टीतील अस्वच्छता, मूलभूत सुविधांचा अभाव आणि दोन ते अडीच किलोमीटर चौरसाच्या परिसरात जवळ-जवळ आठ लाख लोकांचा रहिवास, अशा अनेक कारणामुळे वाटत होते की, आता धारावी कोरोना मुक्त होणे अशक्य आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने हा धोका ओळखून धारावीकडे जास्तीत जास्त गांभीर्यानं लक्ष दिलं. धारावीची प्रशासन व्यवस्था, धारावी परिसरातील सर्व सरकारी व खाजगी डॉक्टर्स व त्यांचा इतर स्टाफ, धारावी मधील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच धारावी मधील सर्व जनता यांनी अथक प्रयत्न करून कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व नियमांचे काटेकोरपणाने पालन केल्यामुळेच आज धारावी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. दोनच दिवसापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) घोषित केले आहे की, धारावी मधील कोरोनाची गंभीर परिस्थिती प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळे धारावी कोरोना मुक्त होण्यास मदत झाली आहे. 
जागतिक आरोग्य संघटनेची कोरोना संदर्भात ही आशादायी बातमी आली अन राजकारण सुरु झाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी "धारावीला कोरोना मुक्त करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे, त्यामुळेच धारावी कोरोणामुक्त करण्याचे श्रेय आमच्या संघाच्या सर्व कार्यकर्त्यांना जाते. यावर राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांच्या या स्व:स्तुती वरती अतिशय कडाडुन हल्ला केला आहे. ते म्हणाले की, " जर तुमचे संघाचे कार्यकर्ते धारावीला कोरोणामुक्त करू शकतात तर, संघाचे मुख्यालय असणारे नागपूर का कोरोनामुक्त केले नाही ?" या सर्व घडामोडीचा बारीक अभ्यास केला तर, असे निदर्शनास येते की संघवाले नेहमीच दुसऱ्यांनी केलेल्या कष्टावर किंवा कामावर आपलेच नाव पुढे करण्याचा प्रयत्न करीत असतात. खरे तर महाराष्ट्राला मागील काही दिवसात कोरोनाने एवढा मोठा विळखा घातलेला होता, परंतु दिल्लीतील संघवाले व मुंबईतील संघवाले जनतेला व सरकारला संकट काळात मदत करण्याऐवजी फक्त महाराष्ट्रातील जनतेची टिंगल करण्यात मग्न होते. याच वेळी त्यांनी जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणी करून, राज्यपालांना विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यास भाग पाडले. खरेतर त्यांना कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीमध्ये सत्ता आपल्याकडे खेचून घेण्याची आस लागली होती आणि त्यासाठी ते काही ही करायला तयार होते. शिवाय संघवाले ज्या दगडा-धोंड्याच्या देवावर व धर्मावर अवलंबून आहेत. त्याच देवांनी आपले दरवाजे बंद करून घेतले होते. त्यांना जनतेची अजिबात काळजी नव्हती. संघवाले ज्या देवावर अवलंबून होते, ते देवच जर लपून बसले असतील तर, हे संघवाले कोरोना पासून जनतेची मुक्तता करण्यासाठी घराबाहेर कसे काय येऊ शकले असते..? खरेतर या सर्व संघवाल्यांचा परंपरागत एक ब्रह्म आहे की, 
"जिथं काही चांगलं होतं, ते आम्हीच करतो," असे त्यांना वाटते. त्यामुळे त्यांनी आता या भ्रमातून बाहेर यावे व समाजात समता, न्याय, ममता, प्रस्तापित करण्यासाठी जाती-भेद, आर्थिक, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत, कारण हे विषमतेच विषारी झाड वर्षानुवर्षे वाढतच आहे. त्यामुळे त्याच्यावरती प्रहार करून ते झाड मुळासकट उपडून काढण्यासाठी पुढे यावे. विनाकारण दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा फुकट मोबदला स्वीकारण्याचा प्रयत्न करू नये. कारण आता महाराष्ट्रातील व देशातील जनता समजदार झालेली आहे. तरी या सर्व जनतेच्या भल्यासाठी खरंच काही चांगलं करायची इच्छा असेल तर, त्यासाठी सदविवेक बुद्धीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies