आटपाडी : येथे राष्ट्रवादीच्या नूतन पदाधिकाऱ्यां निवडीचे पत्र देताना जिल्हाध्यक्ष अविनाश (काका) पाटील, मी आमदार सदाशिव (भाऊ) पाटील व उपस्थित मान्यवर |
आटपाडी तालुका राष्ट्रवादीमय करणार- अविनाश (काका) पाटील
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याची गती बघून महाराष्ट्रातील अनेक लोक पक्षात येण्यास इच्छुक आहेत याचाच एक भाग म्हणून आटपाडी तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्ते पदभार स्विकारत आहेत या सर्वांच्या माध्यमातून आटपाडी तालुका राष्ट्रवादीमय करण्याचा माझा मानस आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जलसिंचन मंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम दुष्काळी भागाला न्याय देण्याची भूमिका घेतली आणि टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांची तातडीने आवर्तन सुरू करून जादाचे पाणी उचलले व सर्व तलाव भरून घेतले यामध्ये खानापूर, आटपाडी जत कवठेमहांकाळ या दुष्काळी भागाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली त्याचेच फलित म्हणून आज शेकडो तरुण राष्ट्रवादी काँग्रेसचा पदभार स्वीकारत आहे.
आटपाडी तालुक्यातील माजी आमदार सदाशिव (भाऊ) पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पद व जबाबदारी पत्राचे वितरण करताना ते बोलत होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी केले. बोलताना ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण आटपाडी तालुक्यातील ताकत आम्ही सदाशिवराव पाटील यांच्या पाठीमागे उभा करून त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमदार करण्याचा माझा मानस आहे.
यानंतर बोलताना युवानेते वैभव (दादा) पाटील म्हणाले, इथून पुढे मी कुणाच्या ओंजळीने पाणी पिणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आटपाडी तालुक्यातील घराघरात माझा कार्यकर्ता मी तयार करणार आहे. त्याचीच सुरुवात म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात 140 लोकांना वेगळ्या सेलच्या माध्यमातून निवड केली आहे. या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा वापर हा जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करावा. काम करत असताना एखाद्या कार्यकर्त्याला जर कुणी अडवलं तर त्याची गाठ माझ्याशी आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
यानंतर बोलताना माजी आमदार सदाशिव पाटील म्हणाले, मी आमदार असताना माझ्या दहा वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आटपाडी तालुक्यातील एकाही व्यक्तीला कधीच आडवले नाही तर त्याचे काम पूर्ण करण्याची भूमिका ठेवली याची परतफेड म्हणून आटपाडी तालुक्यातील लोकांनी मला भरभरून मते दिली म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आज त्यांना पदभार व जबाबदारी देत आहे. इथून पुढे कोणाची कसलीही अडचण असली तरी त्याने मला संपर्क करावा त्याचे काम मी पूर्ण करेन. याप्रसंगी उमेश पाटील करगणी, नारायण खरजे सर, सचिन राजमाने, प्रभाकर पाटील यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली तसेच अनेक युवा कार्यकर्त्यांचे तालुकास्तरीय निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब (काका) पाटील, प्रदेश काँग्रेसचे सदस्य सादिक खाटीक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष करण पवार, सेवादल जिल्हाध्यक्ष निलेश पवार, महिला तालुकाध्यक्ष अश्विनी अष्टेकर, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष जालिंदर कटरे, युवक तालुका सेलचे अध्यक्ष सुरज पाटील तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.