माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : महाविकास आघाडीकडून राज्यात होणारी विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक उमेदवार अर्ज मागे घेण्याचे संकेत दिले आहेत. राजेश राठोड यांचा अर्ज राहणार असल्याने ९ जागांसाठी ९ उमेदवार राहणार असून ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून काल काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर हे उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित होते. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस एक उमेदवार मागे घेत असल्याचे सांगत महाविकास आघाडी पाचच उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे नंदकिशोर उर्फ पापा मोदी यांचा उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय झाला असल्याचे संकेत असून आता ही निवडणूक बिनविरोध करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.