माणदेश एक्सप्रेस न्युज
माळशिरस/संजय हुलगे : माळशिरस तालुक्यात काही भागात पाऊसाने कोरोनाचे थैमान चालू असतानाच गारा व पाऊसाने शेतकऱ्यांला झोडपले. पाचवीलाच पुजलेल्या निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा मागील काही वर्षापासून हतबल झाला आहे. कधी नुकसान तर कधी मालाला भाव नसतो त्यामुळे शेतकरी अडचणीत असतानाच काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी मात्र पूर्ण हवालदिल झाला आहे. रात्रीच्या या अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे झाडे पडून पाळीव प्राणी मरण पावली तर काही जणांची माळवद व घराचे पत्रे ही उडून गेले.
काल रात्री अचानक झालेल्या गारपीट व वादळामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानी हिरावून घेतला. काढणीला आलेले ज्वारीचे पीक व उन्हाळी बाजरी भुईसपाट झाली आहे. त्याच बरोबर शेतकऱ्यांकडे असलेली केळी, डाळिंब, आंबा, कडवळ, मका, ऊस यासारखी आधी पिके जमीनदोस्त झालेली आहेत. अचानक सहाच्या सुमारास जोरदार सुसाट्याचा गार वारा व पाऊसाने थैमान घातले. गत वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने सर्वत्र मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. या वर्षी रब्बी हंगामात पीक जोमात आली होती. यामुळे शेतकरी समाधानी असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे या संकटात शेतकरी सावरतो न सावरतो तोच वादळी पाऊस, गारपीट यातून पुन्हा नैसर्गिक संकटे निर्माण झाली आहेत. बदलत्या हवामानाने याचा चांगलाच परिणाम शेती पिकावर झाला आहे.
गोरडवाडी गावातील आंबे उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेने ओढवलेल्या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा व नुकसान परत मिळणे अपेक्षित आहे. सध्या परिसरात शेतकरी हवालदिल झाले असून नुकसान झालेल्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
माझी तीन एकर केळी पंधरा दिवसांमध्ये काढण्यास येऊ घातली होती. ही केळी रात्रीच्या वादळी वाऱ्यामुळे व गारपीट मध्ये पूर्ण जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे माझे अंदाजे पंधरा ते सोळा लाखाचे नुकसान झालेले आहे. यासाठी शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करावी.Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस
शिवाजी तरंगे शेतकरी, तरंगफळ