आतापर्यंत २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडले
आरोग्यमंत्री राजेश टोपे : ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई, दि.३१ : राज्यात आज १२४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २९ हजार ३२९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४८७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३६ हजार ३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ६२ हजार १७६ नमुन्यांपैकी ६७ हजार ६५५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४४ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७८ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३५८५ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २७२२ एवढे आहे. राज्यात ५ लाख ५८ हजार १०० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ७०४ खाटा उपलब्ध असून सध्या ३४ हजार ४८० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवडयात ११.७ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १५.७ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४३.३५ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे. तर राज्यात ८९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे.