माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख, गटविकास अधिकारी मधुकर देशमुख यांनी आटपाडी पंचायत समितीमध्ये ग्रामरोजगार सेवकांची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी ग्रामरोजगारसेवकांना लाभार्थींना वैयक्तिक लाभ मिळवून देण्याच्या सूचना केल्या व त्यासाठी त्यांनी बक्षीस योजनाही जाहीर केली.
परंतु ग्रामरोजगारसेवक याकडे किती गांभीर्याने घेतील हा महत्वाचा प्रश्न आहे. तालुक्यातील निम्म्याहून अधिक ग्रामसेवकांना रोजगार हमीची कामे म्हणजे काय हेच माहित नाही. महिन्यातून एकदा सोडा सहा महिन्यातून एकदाही बऱ्याच गावातील ग्रामरोजगारसेवक पंचायत समितीला सुद्धा आलेले नाहीत. त्यामुळे गावातील बऱ्याच लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभ मिळण्यासाठी अडचण येत आहे. जर लाभार्थीने पंचायत समितीशी येऊन संपर्क केला तर येथील अधिकारी काम करण्यापेक्षा काम होणार कसे नाही, याचे सल्ले देण्यात वाकबगार झाले आहेत.पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभासाठी शेतकऱ्यांची अहिल्यादेवी सिंचन विहिरीची मागणी असताना त्याकडे कानाडोळा करून गावातील पदाधिकारी वैयक्तिक कामापेक्षा गरज नसताना सुद्धा रोजगार हमी योजनेतून नालाखोलीकरण, सरळीकरण, रस्ता मुरमीकरण या कामांना प्राधान्य देत आहेत. तर अशा आलेल्या कामांना पंचायत समितीमधील अधिकारीसुद्धा मंजुरी देत आहे. परंतु शेतकऱ्याच्या विहिरीच्या फाईल मात्र अनेक वर्ष एका-एका कागदपत्रासाठी घालवत आहेत, याकडे कोण लक्ष देणार? शिवाय काही जाणीवपूर्वक अटीही मुद्दामपणे घातल्या जात असून यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभापासून वंचित राहावे लागत आहे.
बऱ्याच वैयक्तिक लाभाच्या कामांना रोजगार हमी योजनेतील अधिकारी टाळाटाळ करत असून लाभार्थ्यांना एका एका कामासाठी चार-चार, पाच-पाच वेळा पंचायत समितीला हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यातून जर मस्टर निघाला तर तो जमा करण्यापासून ते खात्यावर पैसे जमा होईपर्यंत लाभार्थ्यांना कसरत करावी लागत आहे.
या अटी शिथील कराव्या लागणार ?
१) गटामध्ये विहिरी नसणे २) एका विहिरीपासून दुसऱ्या विहिरीचे अंतर ५०० फुट कमी करणे ३) शेतकऱ्याच्या नावावर सलग ६० आर क्षेत्र ४) ८ अ ला स्वतंत्र खाते असणे या अटी काही प्रमाणत शिथील केल्यावर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या अहिल्यादेवी सिंचन विहीर मोठ्या प्रमाणात होण्यास अडचण होणार नाही.