माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी प्रतिनिधी : दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीचा ६६ वा वर्धापनदिन कार्यक्रम श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला. संस्थेचे संस्थापक कै.श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.विजय लोंढे यांचे शुभहस्ते करण्यात आले .डॉ.संजय सपकाळ यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी डॉ.विजय लोंढे यांनी अध्यक्षीय विचार व्यक्त केले.
१२ डिसेंबर १९५३ मध्ये कै.श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांनी दि आटपाडी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.आटपाडीसारख्या दुष्काळी आणि ग्रामीण भागामध्ये सुरु केलेली शिक्षणसंस्था आज प्रतिकूल परिस्थितीवर मात करत गुणवत्तापूर्ण शिक्षणकार्य पार पाडीत आहे.संस्थेचे चेअरमन अमरसिंह बापू देशमुख विकासाभिमुख,समाजाभिमुख कार्य या माध्यमातून करीत आहे.यावेळी प्रा.विजय शिंदे यांनी श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेत त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची सखोल माहिती दिली व उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या घराण्याची परंपरा, त्यांचे बालपण, शिक्षण, कौटुंबिक जबाबदारी, तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यांनी केलेला संघर्ष,मित्रमंडळींचे सहकार्य, गरिबीवर केलेली मात,औंध संस्थान आणि देशमुख घराण्याचे संबंध,राजकारणातील प्रवेश,राष्ट्रसेवादलाशी संबंध, सामाजिक सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, कृषी, सहकार या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेले कार्य , सभापती पदाचा कार्यकाळ,त्या काळात केलेला तालुक्याचा विकास, साखर कारखान्याची स्थापना, तालुका निर्मितीमधील त्यांचे योगदान.तसेच त्यांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देवून जीवनकार्याची माहिती दिली.
संस्थेचे चेअरमन म्हणून अमरसिंह बापू देशमुख यांना अभिप्रेत असणार्या् शैक्षणिक गुणवत्तेसंबंधी भाष्य केले.संस्थेची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती,नवीन शैक्षणिक धोरणे यावरही प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्रा.आबासाहेब जाधव यांनी मानले.गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.जयंत कुलकर्णी, तसेच प्राध्यापक,प्राध्यापिका,प्रशासकीय सेवक,विद्यार्थी - विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.