माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : अधिक डाळिंब उत्पादनात बाग व्यवस्थापन महत्त्वाचा घटक असल्याचे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर यांनी म्हसवड येथे केले. म्हसवड येथील मोहन डावकरे यांच्या डाळिंबाला महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे येथील संचालक डॉ.कौसडीकर यांनी नुकतीच भेट दिली यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार विजेते विश्वंबर बाबर यांच्यासह मोहन डावकरे, प्रकाश डावकरे, गणपतराव खाडे, धनाजी खासबागे, अशोक खासबागे, तात्यासाहेब ताडे, शिवाजी माने , कृष्णा बाबर व डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कृषी शास्त्रज्ञ डॉ. हरिहर कौसडीकर व राज्य डाळिंब संशोधन संघाचे मारुती बोराटे यांनी डाळिंबाची पाहणी केली. यावेळी डॉ. कौसडीकर म्हणाले, डाळिंब बागेच्या अधिक उत्पादनात बाग व्यवस्थापन महत्त्वाचा घटक आहे. दूरदृष्टीचा विचार करता डाळिंब लागवडीचे अंतर योग्य असावे. त्यावरच भविष्यातील उत्पादन व निव्वळ नफा अवलंबून असतो. डाळिंब बागेला ताण देणे, आंतरमशागत, छाटणी, जैविक खताचा तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय व्यवस्थापन इ. बाबत डॉ. कौसडीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.येथील हवामानाचा विचार केल्यास डाळिंब लागवड माण परिसराला वरदान असल्याने सांगून निव्वळ नफा जास्त मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंब लागवड करावी असे आव्हान डॉ.कौसडीकर यांनी केले. माण तालुक्यातील डाळिंब क्षेत्र व प्राप्त परिस्थितीची माहिती विश्वंभर बाबर यांनी दिली. उपस्थित मान्यवरांचे आभार गणपतराव खाडे यांनी मानले.
दैनिक माणदेश एक्सप्रेस Whats App Group मध्ये Join होण्यासाठी Click करा.