माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडीप्रतिनिधी : राज्यपालांकडून नुकसानीच्या अनुषंगाने अगदी तटपुंजी मदत जाहीर करण्यात आली असल्याने आटपाडी तालुका शिवसेनेच्या वतीने दिनांक 25 रोजी आटपाडी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे निवेदन आटपाडी तालुका शिवसेना प्रमुख साहेबराव पाटील यांनी तहसीलदार यांना दिले आहे.
आटपाडी तालुक्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या ज्वारी, बाजरी, मका, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाला पिकांचे अतोनात व मोठे नुकसान झाले. प्रशासनाच्यावतीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून ते शासनाला सादरही करण्यात आले होते. परंतु राज्याच्या राज्यपालांकडून या नुकसानीच्या संदर्भात शेतकऱ्यांना मोठी मदतीची अपेक्षा असताना तटपुंजी मदत जाहीर करण्यात आली. जाहीर केलेल्या मदतीमध्ये पिकांच्या मशागतीचा सुद्धा खर्च निघत नसल्याने आटपाडी तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना इच्छामरणाचा शिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे शासनाचे या सर्व बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 25 रोजी मोर्चा काढण्यात येणार असल्याने मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन आटपाडी तालुका शिवसेना प्रमुख साहेबराव पाटील यांनी केले आहे.