माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : भारतीय संविधान हे देशाची कार्यप्रणाली निर्धारित करते. संविधानाने जातीय व्यवस्था नष्ट करून कायद्यापुढे सर्वांना समान मानले आहे. शोषित समाजाला संविधानाने मुक्तता दिली. परंतु आजही मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी संविधान बदलण्याची प्रक्रिया चालविली आहे. संविधान बदलून त्यांना मनूच्या विचारांचे राज्य आणायचे आहे. हे बहुजन समाजास घातक आहे. तेंव्हा देशातील प्रत्येक सुशिक्षित नागरिकाने संविधान वाचविण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत प्रा. सुनंदाताई भोस यांनी व्यक्त केले.
आटपाडी येथील संविधान जनजागृतील व्याख्यान मालेतत्या बोलत होत्या. सुंनदाताई भोस यांनी या व्याख्यान मालेतील तिसरे विचारपुष्प गुंफले. यावेळी विचारमंचावर कार्यक्रम अध्यक्ष सादिक खाटीक उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. भोस म्हणाल्या, स्वातंत्र्या पूर्वी जातीय व्यवस्था दृढ होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी या जातीय उतरंडीला छेद दिला. अनेक समाज सुधारकांनी प्रचलित चुकीची व्यवस्था नष्ट करण्यासाठी बंड केले, लढा उभारला, रक्त सांडले. या सर्वांच्या लढ्याला डॉ. आंबेडकर यांनी कायद्यांच्या चौकटीत बसविले आणि व्यवस्था बदलून टाकली. आज भारतीय संविधान लागू होऊनही देशात जाती व्यवस्था, रोटी-बेटी, उच-नीच हे भेदभाव होतात. हे दुर्दैवी आहे.
संविधान हे शोषितांची मोठी ढाल आहे, त्यामुळे शोषक वर्गाला चाप बसला आहे. काही मनुवादी व जातीय व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या सवर्ण पंडितांना संविधान नको आहे. त्यांना मनुवादातील अमानुष प्रथा परंपरा हव्या आहेत. त्यामुळे मनुवाद्यांनी संविधान हटाव मोहीम घेतली आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या पुस्तकाने दिला. ते पुस्तक बदलण्याचा घाट व्यवस्था करीत आहे. तेंव्हा झोपेत असणाऱ्या बहुजनांनो डोळे उघडून वास्तव बघा. आपले संविधान धोक्यात आहे. आणि ते वाचविणे आद्यकर्तव्य आहे. तेव्हा सर्वांनी एकत्रित येऊन संविधान बचाव मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. संविधानाने तुम्हाला वाचविले आता तुम्ही सर्वांनी संविधान वाचविले पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सादिक खाटीक म्हणाले, जगातील सर्वात मोठे कायदाचे पुस्तक भारतीय संविधान आहे. सर्व जाती धर्माना संविधानाने न्याय दिला आहे. उपेक्षिताना तारले आहे. संविधान हे केवळ पुस्तक नसून क्रूर व्यवस्थेची परंपरा नष्ट करणारे हत्यार आहे.
यावेळी कार्यक्रमासाठी मंचाचे अध्यक्ष राजेंद्र खरात, उपाध्यक्ष लक्ष्मण मोटे, रणजित ऐवळे, दीपक खरात,सुरेश मोटे,उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र खरात, सूत्रसंचालन शामराव ऐवळे तर आभार बिपीन देशपांडे यांनी मानले.