पावसाच्या लहरीपणामुळे जलसंधारणाच्या कामात पाणी अडविण्याची गरज: रामराजे
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला - ता.१२: पावसाच्या लहरीपणामुळे पाणी योजनांच्या मदतीने जलसंधारणाच्या कामात पाणी अडविण्याची गरज आहे. असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
वाघमोडेवाडी (ता.माण) येथे आयोजित केलेल्या वाटरकप स्पर्धेत सहभागी गावांचा सन्मान, दातृत्वाचा, कृतज्ञता व विविध कामांचे भूमिपूजन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते.
या कार्यक्रमासाठी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख,अतिरिक्त आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, आयकर विभागाचे उपयुक्त महेश शिंगटे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, ड्रीम फाउंडेशनच्या अनुराधा देशमुख, हर्षदा देशमुख-जाधव, शिवाजीराव सर्वगौड, सुनील माने, पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषद सदस्या डॉ.भारती पोळ, सोनाली पोळ, तानाजीराव कट्टे, अजितराव राजमाने, डॉ. संदीप पोळ, मनोज पोळ, विलास सावंत, बाळासो काळे, प्रशांत वीरकर, भरतशेठ गांधी, अजित पवार, प्रफुल्ल सुतार, डॉ. प्रदीप पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, दुष्काळी तालुक्यातील गावागावात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु या कामाच्या निमित्ताने मनसंधारण झाल्याने गावातील तंटे कमी झाले. दुष्काळी भागातील लोकांमध्ये पिढ्यानपिढ्या निसर्गाशी हिमतीने टक्कर देण्याची ताकद आहे. यंदाचा दुष्काळ मात्र नेहमीपेक्षा भीषण आहे. मात्र आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्यामुळे घाबरुन जाऊ नका. दुष्काळी परिस्थितीत कोणतेही राजकारण न आणता पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत. दुष्काळी भागातील पाणीप्रश्नासह इतर समस्या सोडविण्यासाठी मी निश्चितपणे माझ्या पदाचा वापर करेन असा विश्वासही त्यानी दिला.
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, केंद्र सरकारने निकष न बघता घेतलेले निर्णय राज्य सरकारकडून डोळे झाकून अमलात आणली जात असल्याने दुष्काळी भागावर अन्याय केला जात आहे. येत्या अधिवेशनात याबाबत जोरदार आंदोलन करून दुष्काळाच्या समस्या सोडविण्यास शासनाला भाग पाडू.
प्रभाकर देशमुख म्हणाले, शासनाने लावलेले दुष्काळाबाबतचे निकष चुकीचे असून त्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे, मात्र दुष्काळाबाबत राज्य सरकारच संभ्रमात आहे. यंदाचा दुष्काळ खूप भीषण असून सरकारने लोकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आहे.
उरमोडी योजनेचे पाणी पिंगळी तलावात सोडावे अशा मागणीची चिठ्ठी भाषणादरम्यान रामराजे याना देण्यात आली. त्यावेळी हा विषय साध्या माझ्या कक्षेत नाही.मी मंत्री झाल्यावर मात्र पिंगळीत निश्चित पाणी सोडतो असे सागितले.