आटपाडीत आज प्रा. लक्ष्मण माने यांचे व्याख्यान
संविधान सप्ताहनिमित्त भारतीय संविधानातील आरक्षणाची तरतूद आणि जाती अंतर्गत संघर्ष एक चिंतन या विषयावर व्याख्यान
माणदेश एक्सप्रेस न्यूज चेनल द्वारे होणार लाइव्ह प्रेक्षपण
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी: आटपाडी येथे फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचच्या वतीने चलो संविधान की और अभियानांतर्गत भारतीय संविधान जनजागृती सप्ताहानिमित्त भव्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आटपाडी येथील राजारामबापू हायस्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा ते आठ या वेळेत सातारा येथील माजी आमदार व उपराकार लक्ष्मण माने यांचे भारतीय संविधानातील आरक्षणाची तरतूद आणि जाती अंतर्गत संघर्ष एक चिंतन या विषयावर व्याख्यान होणार आहे. आटपाडी येथील प्रा. संताजी देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. पत्रकार विक्रम भिसे सूत्रसंचालन करणार असून पत्रकार मनोज कांबळे आभार मानणार आहेत. कालकथित नामदेवतात्या ऐवळे यांचे स्मरणार्थ जिल्हा मध्यवर्ती बँक कमर्चारी संघटनेचे उपाध्यक्ष पांडुरंग ऐवळे आटपाडी यांच्या वतीने रात्री भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. हे आत्मचरित्र हिंदी शिवाय इंग्रजी, गुजराथी, तमिळ, फ्रेंच, मल्याळम आदी भाषांतूनही अनुवादित झाले आहे. माने हे भारतातील मागासवर्गीय, भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्यासाठी कार्य करतात. 'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार ते लेखनातून व्यक्त करतात. हे महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात सदस्य होते.
लक्ष्मण माने यांचा जन्म १ जून, १९४९ रोजी सोमंथळी (फलटण, महाराष्ट्र) या एका लहान गावातील कैकाडी समाजात झाला. त्यांना भाई शैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. माने इ.स. २००६ च्या ऑक्टोबरमध्ये नवयान बौद्ध धर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे : लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत. मुंबईत लक्ष्मण माने यांनी त्यांच्या ४२ पोटजातींच्या १ लाख भटक्या विमुक्त प्रवर्गातील समर्थकांसह २७ मे २००७ रोजी बौद्ध धर्म स्वीकारला.
पुस्तके
• उद्ध्वस्त
• उपरा (आत्मकथन)
• क्रांतिपथ (कवितासंग्रह)
• खेळ साडेतीन टक्क्यांचा (लेखसंग्रह)
• पालावरचं जग (लेखसंग्रह)
• प्रकाशपुत्र (नाटक)
• बंद दरवाजा (लेखसंग्रह)
• भटक्याचं भारुड (विधानपरिषदेतील कामाचा लेखाजोखा)
• विमुक्तायन (महाराष्ट्रातील विमुक्त जमाती: एक चिकित्सक अभ्यास)
पुरस्कार
• आंबेडकर व्याख्याता पुरस्कार (२००५)
• न.चिं. केळकर पुरस्कार (१९८२)
• बंडो गोपाल मुकादम पुरस्कार (१९८२)
• पद्मश्री इ.स. २००८
• फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृती (१९८१)
• भारती विद्यापीठ पुरस्कार (१९८२)
• महाराष्ट्र गौरव पुरस्कार (१९९०)
• लेखकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार (१९९८)
• समाजसेवकासाठीचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरसकार (२००६)
• यशवंतराव चव्हाण शिष्यवृत्ती (१९८८)
• साहित्य अकादमी पुरस्कार (१९८१)
• सर होमी भाभा फेलोशिप (१९८५)