“फडणवीसांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी, तर नारायण राणे हे गंजलेली तोफ” : जयंत पाटील
अकोला : फडणवीसांना विरोधी पक्ष नेतेपदाचा अनुभव कमी आहे. त्यामुळे त्यांचा त्रागा सुरू आहे, तर नारायण राणे हे गंजलेली तोफ आहे. त्याच्यामधून आलेल्या गोळ्यांना आम्ही अन् मातोश्रीही महत्त्व देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी टोला लगावला.
अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ अकोल्यात शुक्रवारी घेतलेल्या सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की राज्यात कोरोना आटोक्यात आला आहे. अजून प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे भाजपावाले सरकार पाडण्याचे रोज मुहूर्त काढत आहेत. त्यांच्या मुहूर्तामध्येच आम्ही वर्षपूर्तीकडे वाटचाल केली आहे. सत्ता गेल्याचे दु:ख ते पचवू शकले नाही. त्यामुळे सरकारवर बेछुट आरोप करीत आहे. त्यांची सारी उठाठेव ही चर्चेत राहण्यासाठीच आहे. त्यांना विरोधी पक्षनेते पद किती गांभीर्याने घ्यावे लागते, याचा अनुभव नाही. त्यांनी अजून चार वर्ष तो अनुभव घ्यावा, असा शेलक्या शब्दात त्यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
इतर पक्षातून भारतीय जनता पक्षात गेलेल्या नेत्यांना आता आपली मुस्कटदाबी होते असे वाटत आहे, तर उपऱ्यांना पदे मिळाली व भाजप निष्ठावंत उपेक्षीत राहिले, अशी भावना त्यांच्या पक्षातील अनेक आमदारांची आहे. असे अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. सध्याच किती आहेत, याचा आकडा जाहीर करणे योग्य नाही; मात्र अशा काठावरच्या आमदारांना दिलासा देण्यासाठीच आमचे सरकार येणार, अशी बतावणी भाजप करीत असल्याचाही आरोप जयंत पाटील यांनी केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज