बेघर वसाहतीमध्ये गटारी तुंबल्यामुळे साथीचे रोगाचे थैमान ; अजनाळे ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे जाणून बुजून दुर्लक्ष
माणदेश एक्सप्रेस टीम
अजनाळे : सांगोला तालुक्यातील अजनाळे गावातील बेघर वसाहतीमध्ये असणाऱ्या गटारी मध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे साथीच्या रोगाने या वसाहतीमध्ये थैमान घातले आहे. या वसाहतीमध्ये दहा ते पंधरा रुग्ण चिकनगुनिया आजाराने त्रस्त आहेत हे रुग्ण सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बेघर वसाहतीमधील गटारी मध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास झाल्यामुळे या भागातील राहणाऱ्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. या गटारी मध्ये मोठ्या प्रमाणात घाण असल्यामुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डासांची पैदास वाढत आहे. येथील राहणाऱ्या नागरिकांना चिकनगुनिया, मलेरिया अशा विविध साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. अजनाळे ग्रामपंचायतीकडे गटारी दुरुस्त करण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करून सुद्धा ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यामुळे येथील राहणाऱ्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अजनाळे गावामध्ये चिकनगुनिया, मलेरिया या रोगाने धुमाकूळ घातला असून याची गावातील जवळपास शंभर च्या वर रुग्णांना चिकनगुनियाची लागन झाली आहे. यात लहान मुलांसह, वृद्धांचाही समावेश आहे. गावात साथीच्या रोगाने थैमान घातले असताना आरोग्य विभागाच्या वतीने आतापर्यंत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
आरोग्य विभागाचा कोणताही कर्मचारी व अधिकारी गावाकडे साधे फिरकले सुद्धा नाहीत. आरोग्य विभागाने या साथीच्या आजारावर कोणतीच उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे. साथीच्या रोगांवर वेळीच प्रतिबंधात्मक उपाय योजना आखून रोगाला आळा घालने गरजेचे आहे. गावातील नागरिकांना साथीच्या रोगाने जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त प्रश्न गावातील ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. तरी झोपलेल्या ग्रामपंचायतीने व आरोग्य विभागाने याची तात्काळ दखल घेऊन योग्य ती उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सचिन धांडोरे यांनी केली आहे.