आटपाडीत पहाटेपासून कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस ; शुक्र ओढ्यांचे पाणी पुन्हा वाढले
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : राज्यामध्ये दिनांक १३ ते १७ या कालावधीत हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. तर आज दिनांक १४ रोजी अतिवृष्टीचा इशारा दिल्याने त्याचा मोठा फटका आटपाडी तालुक्याला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज पहाटेपासून पावसाने रिपरिप सुरु केली असून हवामान खात्याचा अंदाज खरा ठरविला आहे. कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस सुरु असल्याने गावा-गावातील गाव ओढ्यांचे पाणी वाढण्याची शक्यता आहे. आटपाडी शहरातून वाहणाऱ्या शुक्र ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. या अगोदरच झालेल्या पावसाने शुक्र ओढ्याला आलेल्या पुराने ओढ्यावरती असलेल्या सिमेंट बंधाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे भराव वाहून गेले असल्याने दोन्ही बाजू कडील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आटपाडीच्या शुक्र ओढ्याच्या बायपास रोडवरती असलेल्या पुलाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पुलाच्या दोन्ही बाजू कडील भराव ही मोठ्या प्रमाणात खचले असून रस्ता धोकादायक बनला आहे. त्यातच आज पुन्हा एकदा प्रशासनाने तालुक्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन देखील तहसीलदार सचिन लंगुटे यांनी नागरिकांना केले असून मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील केले आहे.