दिघंची येथील ओढ्याचे पाणी पुलावर आल्याने दिघंची-म्हसवड मार्ग बंद
माणदेश एक्सप्रेस टीम
दिघंची/प्रतिनिधी : आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा हा तेलंगणा राज्यातील खम्माम व आंध्रप्रदेश येथील काकीनाडा किनारपट्टीवर प्रवेश करणार आहे. या परिस्थितीमुळे आज दि. 14 ऑक्टोबर रोजी आटपाडी तालुक्यात संततधार व मुसळधार पाऊस सुरु असून तालुक्यातील दिघंची येथील गाव ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून सदर पाणी पुलावर आल्याने दिघंची-म्हसवड मार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने आटपाडी-माण तालुक्याचा संपर्क कमी झाला आहे. अजून ही पाऊस सरू असून दिघंची परिसरातील नागरिकांनी काळजी घेवून ज्या नागरिकांची घरे धोकादायक असतील त्या नागरिकांनी तत्काळ ती खाली करून जवळच असणाऱ्या शाळा, हायस्कूल व समाज मंदिरामध्ये आश्रय घेण्याचे आवाहन दिघंची ग्रामपंचायतीचे सदस्य बाळासाहेब होनराव यांनी केले आहे.
आटपाडी तालुक्यामध्ये पहाटे पासूनच पावसाची संततधार मोठ्या प्रमाणात सुरु आहे. दिघंची येथून जाणाऱ्या मार्गावर गाव ओढ्याचे पाणी पुलावर आल्याने वाहतूक बंद असल्याने राजेवाडी, लिंगीवरे, पुजारवाडी (दि.) या गावांचा संपर्क तुटला आहे. तर दिघंची येथील साळशिंगे वस्ती जवळून वाहणाऱ्या ओढ्यालाही मोठ्या प्रमाणात पाणी आले असून सदरचे पाणी पुलावरून वाहत असल्याने दिघंची-हेरवाड या राज्यमार्गावरील वाहतूक ही बंद झाली आली आहे.
आटपाडी शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या शुक्र ओढ्या ही धोक्याच्या पातळीवरून वाहत असून दुपारी १२.०० वाजले पासून पुलावर पाणी असल्याने या ठिकाणहून होणारी वाहतूक ही बंद करण्यात आली असून याठिकाणी आटपाडी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला असून पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट लावण्यात आलेल्या आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस