कोरोनाशी लढण्याबरोबरच तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामांना वेग द्या ; राजेंद्र खरात
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात कोरोनाचे व अतिवृष्टी या दोन्हीचे संकट मोठ्या प्रमाणात घोंगावत आहे. कोरोनाच्या संकट काळात आटपाडी तालुकावासियांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी प्रशासन चांगले काम करीत असले तरी वाढत्या मृत्यूदरामुळे चिंतेचे वातावरण ही आहे.
एकीकडे कोविडसोबत लढा देताना तालुक्यात मागील १५ दिवसात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व तालुक्यातील ओढे-नाले, माणगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. यामुळे शेतकरी वर्ग जरी सुखावला असला तरी त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. अनेक पिके पाण्यात उभी आहेत. पाण्याचा उपसा होण्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. यामुळे अगोदरच कोरोनामुळे संकटात असलेल्या शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांच्या झालेल्या नुकसानीचे अजून ही काही ठिकाणी प्रशासनाने पंचनामे केले नसल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक ठिकाणचे रस्ते, पुल वाहून गेले तर अनेक ठिकाणचे रस्ते पूर्णत: खचले आहेत. त्यामुळे याचा मोठा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. काही गावातील असणाऱ्या स्मशानभूमीत देखील पाण्यात असून त्यांची पूर्णत: दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेवून कोरोना लढयाबरोबरच तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचमाने करून व रस्ते, पुल दुरुस्त करून विकास कामांना ही गती द्यावी असे आवाहन आटपाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी तालुका प्रशासनाला केले आहे. याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. रामदास आठवले, खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिलभाऊ बाबर यांच्याकडे लेखी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज