सायली चव्हाण खून प्रकरणातील संशयितांना एक ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी
आटपाडी/प्रतिनिधी : पुजारवाडी (आटपाडी) ता. आटपाडी, जि. सांगली येथील येथील सायली अक्षय चव्हाण या विवाहितेचा चाकूने गळा चिरून खून करणाऱ्या तीन संशयितांना एक ऑक्टोंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विटा न्यायालयाने दिले.
काल शनिवारी पहाटे सोनारसिद्ध येथे अक्षय गोरख चव्हाण यांनी आपली पत्नी सायली हिचा कट रचून उत्तर प्रदेशातील असणाऱ्या तिघा युवकांच्या मदतीने खून केला होता. हा खून पोलिसांनी उघडकीस आणला व पत्नीने आत्महत्या केली असे सांगणाऱ्या अक्षय चव्हाण याला पोलीसांनी बेड्या ठोकल्या. या खून प्रकरणाती संशयित पती अक्षय गोरख चव्हाण (वय 23 रा सोनारसिद्ध नगर) अंकित कुमार विजय पाल सिंग (वय 24), रणजीत उर्फ शिवा लालसिंग (वय 20) या तिघांना पोलिसांनी तातडीने शोध घेऊन अटक केली. आज विटा येथे न्यायालयात हजर केले असता 1 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने या घटनेचा तातडीने तपास सुरू केला. सायली चव्हाण हिच्या खुनामुळे आटपाडी तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अक्षय चव्हाण व सायली यांचे प्रेम प्रकरण होते. दोन वर्षापूर्वी प्रेम प्रकरणातून दोघांनी घरच्यांचा विरोध असतानाही पळून जाऊन विवाह केला. परंतु दोन वर्ष हि संसार टिकला नाही. अक्षय ला दारूचे व्यसन लागले. तो वाळूचा व्यवसाय करु लागला. रात्री अपरात्री घरी येवू लागला पत्नी सायली हिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे दोघांमध्ये वाद-विवाद होऊ लागले. प्रसंगी तो पत्नीला मारहाण हि करु लागला.
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर तो राग करीत होता. या रागातूनच आटपाडी येथील साठे नगर व बालटे वस्ती येथे राहणारे परप्रांतीय दोन युवक व एक अल्पवयीन मुलगा याच्या मदतीने चाकुने गळा कापून चिरून खून केला. आटपाडी पोलिसांनी दिड तासात खुनाचा छडा लावला. सायलीच्या शवविच्छेदना नंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. विट्याचे पोलीस उप अधीक्षक अंकुश इंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पोलिसांना तपासाच्या सुचना दिल्या. आटपाडी तालुक्यात या घटनेमुळे खळबळ माजली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस