उद्धव ठाकरे तुम्ही खुदा बनू नका : प्रकाश आंबेडकर
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपण कोरोनामुळे होणारा मृत्यू दर आटोक्यात आणू, असे म्हटले आहे. त्यावर उद्धवजी तुम्ही खुदा बनू नका,अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे,भारतीयांची रोग प्रतिकार शक्ती चांगली आहे. त्यामुळे त्यांना जास्त काही होणार नाही. ते कोरोनाने नाही तर रोजगार बुडाल्याने मरतील. त्यामुळे तुम्ही लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
भारतात 40 टक्के नागरिक कोरोनाने बाधित होतील असे अमेरिकेच्या हाफकीन संस्थेने सांगितले होते. पण एकाच आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या वैज्ञानिकांनी सांगितले की, भारतात कोरोना पसरणार नाही. भारतातील नागरिकांची प्रतिकारशक्ती चांगली आहे.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे म्हणणे खरे ठरले असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. बुद्धाने एक सत्य वचन सांगितले आहे की, माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू हा निश्चित आहे. त्यामुळे शासनाला विनंती आहे की, देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या कामाला लागावे. तरच माणसं जगतील अन्यथा उपासमारीने मरतील. त्यामुळे आता लॉकडाऊन वाढवू नका, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.