अजनाळेत डाळिंब पिकावर ‘तेल्या’ रोगाचे थैमान
शेतकरी आर्थिक संकटात ; नुकसान भरपाई देण्याची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : दिवसा पडणारे कडक ऊन, ढगाळ हवामान व अधून-मधून पडणारा पाऊस या सध्याच्या लहरी हवामानामुळे राज्यामध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख असणाऱ्या अजनाळे येथील डाळिंब आगारावर तेल्या रोगाचा मोठा प्रादुर्भाव वाढल्यामुळे येथील शेतकरी संकटात सापडला आहे.
महाराष्ट्राच्या नव्हे तर जगाच्या नकाशात डाळिंब उत्पादनाच्या बाबतीत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अजनाळे येथील डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यावर मोठे संकट निर्माण झाले आहे. अजनाळे गावात १३०० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात डाळिंब बागेची लागवड करण्यात आली आहे.
मात्र तेल्या रोगाने शिरकाव केल्यामुळे येथील शेतकरी राजा अडचणीत सापडला आहे. लाखो रुपये खर्च करून डाळिंबाचा बहार धरला आहे. मात्र तेल्या रोगाने प्रादुर्भाव केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. कृषी विभागाने तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या डाळिंब बागेची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अजनाळे येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
सध्याच्या वातावरणामध्ये बहरलेल्या डाळिंब बागेवर मोठ्या प्रमाणात तेल्या रोगाने थैमान घातले आहे. कडक ऊन व सुरुवातीपासून सततच्या पडणाऱ्या पावसामुळे तेल्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. कमी पाण्यावर व कमी खर्चात भरगोस उत्पादन देणारे डाळिंब या पिकावर तेल्या रोगाचे सावट आल्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याने शासनाने लक्ष घालून मदत करावी.प्रा. हणमंत कोळवलेडाळिंब उत्पादक शेतकरी