बिनबुडाचे आरोपापेक्षा गावची शांतता व सुरक्षिततेकडे लक्ष दया : रोहित देशमुख
माणदेश एक्सप्रेस न्युज
दिघंची/प्रतिनिधी : कोरोना विषाणूचे जगावर संकट असताना दिघंचीचे सरपंच राजकीय कुरघोड्या करत असल्याची बाब निंदनीय असून त्यांनी बिनबुडाचे आरोपापेक्षा गावची शांतता व सुरक्षिततेकडे लक्ष दया असे रोहित देशमुख यांनी सरपंच अमोल मोरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून गावात अनेक ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी झालेली नाही, गावात अनेक ठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरील एलईडी बंद अवस्थेत आहेत. अंधाराची परिस्थिती आहे. मुख्य पेठेतील रस्त्यांची दुरावस्था आहे अशा अनेक प्रकारे समस्या असताना सरपंचाना राजकारण सुचत आहे. दिव्यांगांना दिला जाणारा ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी हडप करून त्यांना जीवनावश्यक वस्तूचे किट दिले जाते यापेक्षा दुर्दैव ते काय असावे? एकीकडे महामारी संकट असताना सरपंच मात्र त्यांची आर्थिक पोळी भाजून पोट भरण्याचे उद्योग करीत आहेत. त्यांनी दिघंची विकास सोसायटीवर केलेला आरोप बिनबुडाचे असून त्याला परिसरातील शेतकरी व सभासद थारा देणार नाहीत. दिघंची मधील मध्यवर्ती ठिकाणी असलेले लाखो रुपयांची सरकारी जागा विक्री करण्याचा घाट हाणून पाडला म्हणून ते खालच्या पातळीवर जाऊन बिनबुडाचे व बालीश आरोप करत असून त्यांनी तालुक्यातील इतर ग्रामपंचायतीचा आदर्श घ्यावा असे रोहित देशमुख म्हणाले.