गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना खातेदार शेतकरी व त्याच्या कुटुंबातील एका सदस्यास लागू
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन 2015-16 पासून राबविण्यात येत आहे. सन 2019-20 मध्ये योजनेची व्याप्ती वाढवून योजनेमध्ये राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती / पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषि आयुक्तालयाचे आयुक्त (कृषि) यांनी दिली.
अपघातग्रस्त कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता सुमारे 1.52 कोटी वहिती खातेदार शेतकरी व वहिती खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्यांच्या कुटंुबियातील एका सदस्यांचा देखील सदर विमा योजनेंतर्गत समावेश करून एकूण 3.04 कोटी जणांना सदर योजनेंतर्गत प्रचलित योजना अधिक व्यापक व सर्वसमावेश करण्यात आली आहे. खातेदार शेतकऱ्यांकरीता शासन स्वत: विमा हप्ता भरते. अपघाती मृत्यू अथवा दोन अवयव निकामी झाल्यास 2 लाख रूपये व एक अवयव निकामी झाल्यास 1 लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात येते. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना दिनांक 10 डिसेंबर 2019 ते 9 डिसेंबर 2020 या कालावधीकरीता असून या योजनेचे शासन निर्णय व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.