माणदेश एक्सप्रेस न्युज
वरकुटे-मलवडी/वार्ताहर : २६ वधु-वरांचे पालकत्व स्विकारुन, फुलाबाई बापू नरळे सामाजिक, शैक्षणिक ट्रस्ट व साईसागर फौंडेशनचे संस्थापक तानाजी बापू नरळे व सौ. कल्पनाताई तानाजी नरळे या उभायतांनी आयोजित केलेल्या सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यास दहाहजार लोकांनी हजेरी लावत शुभाशिर्वाद दिले. यावेळी वधुवरांना संपूर्ण पोशाख व संसारासाठी ५१ भांड्यांचा सट मान्यवरांच्या हस्ते सप्रेम भेट म्हणून देण्यात आला. वरकुटे-मलवडी ता.माण येथील श्री.यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या भव्य मैदानावर मोठ्या उत्साहात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला. यावळी महाराष्ट्राचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे, मा. कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, भागवत आटपाडकर, अभय जगताप, महादेव बाड, संस्थेचे सचिव प्रा.शिवाजी गवंड आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वधर्मीय सामुदायिक मोफत विवाह सोहळ्यात सकाळच्या सत्रात वधू-वर आणि पालक परिचय मेळावा संपन्न झाला. त्यानंतर दुपारी ४ वा. दहा हजार लोकांच्या आशिर्वादांची अक्षता डोक्यावर घेतल्या. किल्लारी ता. औसा, अहमदनगर, पुणे, मिरज, इस्लामपूर ता. वाळवा, सांगोला, कवठेमहांकाळ, औंध ता.खटाव, आटपाडी आदी तालुक्यातून सहभागी झालेली १३ वधु-वरांची जोडपी एकाच वेळेस सुखी सहजीवनाच्या विवाहबंधनात गुंफली गेली. सर्वसामान्य व गरजू वधु-वरपित्यांना मदतीचा हात देत, आईने दिलेल्या संस्काराची शिदोरी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तानाजी नरळे यांनी आपल्या मायभुमीत सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचे नियोजन केले होते.माण तालुक्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या इतर ठिकाणांहून आलेल्या सहव्वीस वधु-वरांच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे जंगी नियोजन यशस्वीपणे पार पाडून, उपस्थित असलेल्या लोकांचा येथेच्छ पाहुणचार करीत स्वादिष्ट अन्नदान केले. स्वतःच्या कमाईचा काही हिस्सा समाजाच्या चांगल्या कामी खर्च करून तानाजीराव बापू नरळे यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी एल.डी.नरळे, अशोक नरळे, गोरख शिंदे, शिवाजी नरळे, नवनाथ रानगट, परमेश्वर खांडेकर, वंदना नरळे, दादासाहेब खांडेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तर लखन खांडेकर, कविता यादव यांनी उत्कृष्टपणे निवेदन केले.
a