माणदेश एक्सप्रेस न्यूज
म्हसवड/अहमद मुल्ला : विविध ठिकाणी सामान्य ग्राहकांच्या होणाऱ्या फसवणुकी विरोधात न्याय मागण्यासाठी ग्राहक पंचायत लढणारी संघटना असून ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंतचे काम सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे प्रतिपादन सातारा जिल्हा ग्राहक पंचायत (महाराष्ट्र) च्या जिल्हा अध्यक्ष सुनिता राजेघाटगे यांनी गोंदवले येथे केले.
गोंदवले येथे सातारा जिल्हा ग्राहक पंचायतीच्या जिल्हा कार्यकारिणीची बॆठक संपन्न झाली. यावेळी त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, कार्यकर्त्यांनी ग्राहकांना मार्गदर्शन करावयाचे आहे व संबंधित ग्राहकालाच सर्व सोपस्कर पार पाडावयास सांगावे. ग्राहकांना त्यांचे हक्क व कर्तव्ये यांची जाणीव व करून द्यावी.
तर जिल्हासंघटक सुरेश उबाळे (म्हसवड) यांनी भुमापन कार्यालय म्हसवड येथे व्हावे, दहिवडी आगाराने बंद केलेल्या लांब पल्ल्याच्या एस.टी. गाड्या तातडीने सुरु कराव्यात अशी मागणी केली. वीज महामंडळाने वीज देयके वेळेत ग्राहकांना पोहोच करणे आवश्यक आहे अशा प्रकारच्या समस्या मांडल्या. त्यावर जिल्हा सचिव मनीष गायकवाड व प्रसिद्धिप्रमुख रंगराव जाधव (सातारा) यांनी त्वरित संबंधित विभागाला पत्रव्यवहार करण्यात येईल असे सांगीतले. बॆठकीत जिल्हाउपाध्यक्ष सोपानराव देशमुख (खंडाळा) यांनी आपण केलेल्या कामांना वृतपत्रात प्रसिद्धी देण्यासंदर्भात पत्रकार व संपादकांना प्रत्यक्ष भेटून विनंती करण्यात यावी अशी सुचना मांडली. सुरेश फणसे व सुरेश बर्गे (कोरेगाव) यांनी एका पतसंस्थेमध्ये ग्राहकांचे अडकलेल्या ठेवीबद्दल त्यांनी केलेले प्रयत्न सांगितले.
बैठकीसाठी सुभाष पवार, प्रल्हाद कुलकर्णी, प्राचार्य दिलीप कट्टे उपस्थित होते. माण तालुका संघटक अजित काटकर यांनी आभार मानले.