जनतेच्या प्रश्नासाठी कायमस्वरूपी लढत राहणार : शेखरभाऊ गोरे
माणदेश एक्सप्रेस न्यूज
म्हसवड/प्रतिनिधी : आजपर्यंत मी जनतेसाठी लढत आलो. या पुढेही जनतेच्या प्रश्नासाठी लढत राहणार आहे. वर्षानुवर्षे काँग्रेस, राष्ट्रवादीने पाण्याचे गाजर दाखवून माण-खटावच्या जनतेला फसवून मताचा जोगवा घेतला. दहा वर्षे आमदारकी भोगणाऱ्या महाभागाने पाणी आणले नाही तर राजीनामा देईन ही भावनिक हाक देवून स्वार्थी राजकारण करुन जनतेला पाण्यासाठी झुलवत ठेवले. याचा हिशोब जनता मागितल्याशिवाय राहणार नाही. मला वेळो-वेळी कधी मोका कधी इतर केसेसमध्ये अडकवून ठेवण्याचे काम करणाऱ्यांनी यापुढे गाठ माझ्याशी आहे. मला जेवढा त्रास द्यायचा आहे तो द्या. पण यापुढे माझ्या कार्यकर्त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देवू. राहिला प्रश्न कोठे जायचा. जो पक्ष माण-खटावच्या जनतेची तहान भागवून पाण्याच्या योजना पूर्ण करेल त्याच्या मागे जाणार? माण खटावच्या स्वाभिमानी जनतेला कोणाच्या तरी दावणीला बांधून तुमच्या स्वाभिमानाला धक्का लागेल असा निर्णय घेणार नाही. दोन दिवस मला वेळ द्या, त्यानंतर ठरवू कोठे जायचे असे भावनिक आवाहन शेखरभाऊ गोरे यांनी हजारो चाहत्यांना केले.
माण-खटावचे नेते शेखरभाऊ गोरे यांनी दहिवडी येथे त्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणाबरोबर राहायाचे की, पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जायचे या विषयी कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेतल्या. कार्यकर्त्याच्या भावनांचा यावेळी बांध फुटला होता.
त्याला उत्तर देताना शेखरभाऊ म्हणाले, राष्ट्रवादीत आल्यापासुन पक्षाच्या गेलेल्या सत्ता पुन्हा पक्षाकडे आणल्या असतानाही पक्षातील मंडळी माझ्यावरच कुरघोडी करु लागली होती. ते ही पाठीवर टाकले तरीही त्याची कारस्थाने थांबली नाहीत. माझ्यावर व माझ्या कार्यकर्त्याना अन्याय सुरु ठेवला होता. ही घटना पक्ष प्रमुखाच्या कानावर घालण्यासाठी फलटणच्या संवाद मेळाव्यात आमची मते मांडू द्या, एवढी मागणी केली तरीही ती पक्षाने आमच्या भावना ऐकून घेतल्या नाहीत हिच का राष्ट्रवादीची पक्ष धोरणे? जो काम करतो त्याच्यावरच अन्याय करायचा व जो पक्षा पुढे सुट-बुट घालून एक ग्राम पंचायत निवडून आणू शकत नाही त्याचा सन्मान होतो. स्व. तात्याच्या बाबतीतही असेच त्यांना पक्षातील मंडळीनी त्रास दिला तसाच त्रास मला राष्ट्रवादीची मंडळी देत आहेत. त्याच्यात दम असेल तर समोरा-समोर या दुध का दूध पाणी का पाणी होईल असे शेखरभाऊ गोरे म्हणाले.
ज्यांना-ज्यांना शेखर गोरेंनी निवडणुकीत निवडून आणले, त्यांनी भाऊला धोका दिला. त्याची आत्ता उलटीगिनती सुरु झाली आहे, असे वैभव मोरे यांनी सांगितले. महाराष्ट्रात एकमेव नेता आहे, स्वताच्या वाढदिवसाला जनतेची तहान भागवण्यासाठी पूर्वी नऊ टँकर होते. आत्ता त्यात भर करुन आणखीन चार पाण्याचे टँकर देणारा नेता आहे. यापूढे भाऊप्रेमीनी लक्षात ठेवावे, गाव तिथे भाऊ ही संकल्पना आगामी काळात राबवण्यासाठी कामाला लागा, असे वैभव मोरे यांनी सांगितले.
शेखरभाऊ कोणत्या पक्षात जायचे? औंध ग्रामपंचायतीचे सदस्य मोदी म्हणाले, औंध ग्रामपंचायत निवडणुकीत शेखरभाऊ गोरे पुरुस्कृत पँनलचे नेतृत्व केले होते. यात सरपंचपदाचा उमेदवार थोडक्या मताने गेली. मात्र सात सदस्य विजय झाले ही किमया शेखरभाऊनी केले. तुमचे नेतृत्व माण-खटावच्या जनतेने स्विकारले आहे, तुम्ही तुमचा आजच निर्णय घ्या, असे मोदी म्हणाले. मार्केट कमेटी सदस्य महादेव अवघडे म्हणाले,भाऊ तुम्ही कोठे ही जा आम्ही तुमच्या पाठीमागे सावलीप्रमाणे राहु, पण ज्या पक्षात जाणार आहे, तो पक्ष तुम्हाला कोणता शब्द देणार असेल तर बिनधास्त चला, आम्ही तुमच्या बरोबर आहे.