भाजप सरकार हे नाकर्ते व शेतकरीविरोधी-अजित दादा पवार
माणदेश एक्सप्रेस न्युज
नातेपुते/प्रमोद शिंदे: भाजप सरकार हे नाकर्ते व शेतकरीविरोधी सरकार आहे. असे मत राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आम. अजित पवार यांनी आज दि. ५ रोजी नातेपुते येथे कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान व्यक्त केले. हे सरकार फक्त निवडणुकांपुरतेच काम करते. फक्त निवडणुका व प्रचाराचं बघत असून बाकी काहीही बघत नाही. राज्यात पाच वर्षात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून कालच लाखेवाडी येथे खाडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. कारण खूप कर्ज झाले होते. कर्जाची परतफेड होत नसल्याने त्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागली याला जबाबदार सरकारच आहे. सध्या दुष्काळजन्य परिस्थिती आहे. तरीसुद्धा सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही. सध्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. पाण्याची सोय कुठे आहे का? टँकर कुठे चालू आहेत का? याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. गेल्या पाच वर्षात या सरकारने काहीही केले नाही; म्हणून चांगले प्रतिनिधी निवडून देणे गरजेचे आहे. अशाप्रकारे त्यांनी भाजप वर सडकून टीका केली.
अजित पवार हे नातेपुते येथे अक्षय भांड यांच्या घरी कार्यकर्त्यांना भेटण्यास आले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक डोंगरे, अक्षय भांड, लखन चांगण, सागर ठोंबरे, रवी काळे, अक्षय कचरे, ओंकार पवार, अभिषेक भांबुरे, चैतन्य चांगण, सौरव राडे व असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.