मदतीची विकासातून परतफेड करणार: खा. संजय पाटील: आटपाडीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न: आपला उमेदवार म्हणून काम करा: तानाजी पाटील
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी : सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन,समृद्धी यावी म्हणून राजकारण करतो. मदत करणाऱ्याचे प्रामाणिकपणाने आयुष्यभर काम करेन. शक्तीची,मदतीची परतफेड विकासाच्या माध्यमातून करू, असे आश्वासन खासदार संजय पाटील यांनी आटपाडी येथे दिले.
आटपाडी तालुक्यातील शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आ.अनिलभाऊ बाबर, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब काळेबाग, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, मोहनभाऊ देशमुख, हरिदास लेंगरे, सरपंच वृषाली पाटील, अड.धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार पाटील म्हणाले, जिल्ह्यातील संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला आ.अनिलभाऊ बाबर यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी दिला होता. समाजाचे नाव सांगून व वारसा घेऊन येणाऱ्या माणसापेक्षा विकासाच्या कामाचा माणूस म्हणून निवडून द्या. टेंभूला निधी मिळण्यासाठी, अनुशेष पूर्णत्वासाठी केंद्रसरकारमधून पैसे आणले पाहिजेत असे अनिलभाऊ टेंभू योजनेच्या पूर्णत्वाबाबत मुंबईत आले असताना, आम्ही बळीराजा जलसंजीवनी योजना, नीती आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न करून व 81-19% कृष्णा खोऱ्यासाठी 81% पैसा उभा केला. टेंभू योजनेसाठी बाराशे कोटी रुपये मंजूर केले. चार पाच महिन्यात योजना पूर्ण होईल. आटपाडी तालुक्यातून रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी खासदारकी पणाला लावून पाच वर्षात कामाला सुरुवात करू. पाठबळ दिल्याबद्दल प्रामाणिकपणाने आयुष्यभर काम करेन. शक्तीची परतफेड विकासाच्या माध्यमातून करू असे आश्वासन त्यांनी दिले.
खासदारांनी जूनपासून विकासाची हवा आणावी : आमदार बाबर
आ. अनिल बाबर बोलताना म्हणाले, कामाचा ध्यास आणि विकासाची उर्मी असली तर काम करू शकतो. जातीवर राजकारण करता येत नाही. विकासाच्या दिशा निवडणुकीत येत नाहीत. माणूस जगण्यासाठी पाण्याचा प्रश्न सोडवायचा विचार केला पाहिजे. पाण्यासाठी शासनाने मदत केली म्हणून किमया झाली आहे. आम्ही मंत्र्यांकडे कामाला जाताना आमची मान उंच असली पाहिजे, असे मतदान करा. फेसबुक, व्हाट्सअप लोकांच्या डोक्यातून डिलीट होते, मात्र ते हृदयातून डिलीट होत नाही. विकासाच्या कामासाठी भांडले पाहिजे. पाणी आले म्हणजे सर्व प्रश्न संपले असे नाही. आणखी अनेक शिल्लक प्रश्न आहेत. शेतीपद्धती, हंगाम बदलून उत्पादन कसे वाढवता येईल याचा विचार केला पाहिजे. भाजप-शिवसेना युतीचा फायदा हा आहे की, संघर्षात वेळ घालवण्यापेक्षा हातात-हात घालून काम केल्यास चित्र बदलण्याची नांदी निर्माण होईल. विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची निवडणूक आहे. कार्बो,ड्रायपोर्ट यासारखे प्रकल्प पूर्णत्वासाठी वेळ मिळाल्यास चलनवाढ होईल. विकासाच्या दृष्टीने शक्तिमान व्हायला पाहिजे. मतभेद वाहत्या पाण्यात सोडून आता काम केले पाहिजे. पाणी, रस्ते, विजेचे दर, वीज हे प्रश्न सोडवण्यासाठी विकासाला मत दिले पाहिजे. निवडणुका संपल्यानंतर खासदार पाटील यांनी जूनपासून आटपाडीला विकासाची हवा आणली पाहिजे. तालुक्याच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या विकासाचा आराखडा तयार करा. आमदार, खासदार व पदाधिकारी एकत्रपणे शासनाच्या दारी जाऊन विकास करता येईल. संघर्ष करण्यापेक्षा शक्ती दिली तर मतदारसंघातील चित्र बदलेल.
आपला उमेदवार म्हणून काम करा : तानाजीराव पाटील
यावेळी बोलताना शिवसेनेचे तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी व दुष्काळ कायम संपण्यासाठी टेंभू योजना अनिलभाऊंनी अंगात घेतली आहे. संकल्प पूर्ण करण्यासाठी भाऊंना चांगला जोडीदार पाहिजे. आम्ही ज्याला मते दिली त्याला राबवून घेतो. आम्ही कष्टातून कार्यकर्ते तयार केले आहेत. संजयकाकांनी कार्यकर्त्यांची कामे करावीत. रस्ते कामासाठी अनिलभाऊंनी 300 कोटी रुपये आणले. आता संजयकाकांच्या माध्यमातून पंढरपूर-कराड रेल्वेमार्ग तालुक्यातून जावा, तालुक्यात नवनवे उद्योग आणावेत, उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणीही त्यांनी खासदार पाटील यांच्याकडे केली. तसेच तालुक्यातून मिळणाऱ्या मतांमध्ये आमची किंमत वेगळी दिसली पाहिजे. कामे निम्मी-निम्मी घ्या, आपला उमेदवार समजून काम करणार आहे. विधानसभा,लोकसभेला कार्यकर्त्यांनी माणसं ढिली सोडली तर त्याचा त्रास होतो, गावात त्यांचेच काम टिकते जो प्रत्येक निवडणुकीत टाईट असतो. आपण स्वतः उमेदवार आहे असे समजून काम केले पाहिजे. तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी कंबर कसावी.
एकत्रितपणामुळे विकासाला संधी मिळेल : पृथ्वीराज देशमुख
यावेळी बोलताना भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख म्हणाले, आमदार भाऊंनी भाजप-शिवसेनेचा आघाडी धर्म पाळला. खासदार, आमदार एकत्रित असताना विकासाला संधी मिळेल. आ. अनिलभाऊंची कामाची चिकाटी असते. भाजपा तुमच्या पाठीमागे ताकदीने उभा राहील.
यावेळी अड.धनंजय पाटील यांनी स्वागत केले. साहेबराव चवरे, कौठुळीचे माजी सरपंच शिवाजीराव कदम, जेष्ठ नेते अण्णासाहेब पत्की, मोहनभाऊ देशमुख, अनिल पाटील, दत्तात्रय यमगर, हरिभाऊ लेंगरे आदींची भाषणे झाली. बाळासाहेब होनराव यांनी सूत्रसंचालन केले.
दिघंचीचे माजी सरपंच पांडुरंग शिंदे, सरपंच अमोल मोरे, वसंत हाके, ओंकार जवळे, रवीशेठ सातारकर, मारुती मगर, सुभाष जगताप, बंडू कातुरे, धनंजय वाघमारे, संतोष पुजारी, मुन्ना तांबोळी, किशोर जाधव, राजेश नांगरे, अभिजित देशमुख, भारत जवळे यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.