तुम्ही फक्त भाजपकडून माढा लोकसभेला उभे रहा
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांचे खुले आवाहन
आनंदाच्या फुटलेल्या उकळ्या क्षणीक आहेत.
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई: “शरद पवार यांनी माढामधून माघार घेतली हा आमचा पहिला विजय” या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला. तुम्ही फक्त भाजपकडून माढा लोकसभेला उभे रहा, विजय कुणाचा होतो हे जनता ठरवेल असा पलटवार त्यांनी केला. त्यामुळे मोकळ्या आनंदाच्या उकळ्या आणून काही उपयोग होणार नाही या निवडणुकीमध्ये काय होणार आहे मायबाप जनता ठरवेल असेही ते म्हणाले.
पवार साहेबांनी माघारी घेतल्याने भाजपला आनंद होणे स्वभाविकच आहे. परंतु अघोरी आनंद व्यक्त करणे हे जे भारतीय जनता पार्टीचे चालू आहे हा त्यांचा पराभव आहे.
माढ्यामधून पवार साहेबांनी निवडणूक लढवावी हा कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह होता. तसेच त्यांनी निवडणुकीतून माघार का घेतली हे स्पष्ट केले होते. त्यामुळे साहेबांच्या माघारी घेण्याने भाजपला आनंदाच्या फुटलेल्या उकळ्या क्षणीक आहेत असाही टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना लगावला असून 23 तारखेला या निवडणुकांचे निकाल लागणार असून 24 तारखेला मी स्वतः वर्षा बंगल्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विजयाचे पेढे खाऊ घालण्यासाठी येईल असे म्हणाले.