लिंगीवरे येथील पुलावरून दुचाकी गेली वाहून ; कॅमेऱ्यात घटना कैद
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : दुष्काळी टापू माणदेशात पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असल्याने दुष्काळी भागातून वाहणाऱ्या माण नदीला यावर्षी पूर आला आहे. या पुराच्या पाण्यात राजेवाडी-लिंगीवरे गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असताना एका इसमाने त्या पाण्यामध्ये आपली दुचाकी गाडी घालण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये सदर इसमाची दुचाकी गाडी वाहून गेली असून सदरचा इसम मात्र बालबाल बचावला आहे. सदरची घटना ही तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सलग दुसऱ्या वर्षी झालेल्या पावसाने राजेवाडी तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून माण नदी दुथडी भरून वाहू लागली असून नदीला पूर आलेला आहे. राजेवाडी गावचा आटपाडी तालुक्याशी असणारा संपर्क तुटला असून नागरिकांना ये-जा करणे अवघड बनले आहे. अशी परिस्थिती असताना एका इसमाने पुराच्या पाण्यात गाडी घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुलाच्या दुसऱ्या बाजूकडील असणारे नागरिक त्याला ओरडून धोक्याची सूचना देत होते. त्यास परत माघारी जाण्याच्या सूचना करीत होते. त्याकडे दुर्लक्ष करून इसमाने पुराच्या पाण्यामध्ये गाडी घातली. मात्र पाण्याचा प्रवाह मोठ्या असल्यामुळे गाडीसोबत इसम पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जावू लागली. यावेळी नागरिकांनी त्यास गाडी सोडून देण्याची सूचना केली. प्रसंगावधान राखून इसमाने गाडी सोडून दिली व पाण्याच्या मोठ्या प्रवाहाबरोबर गाडी वाहून गेली. गाडी जरी वाहून गेली असली तरी सदरचा इसम मात्र बालबाल बचावला आहे.
माण नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येणार असल्याची सूचना पंढरपूर पाटबंधारे विभागाने दिल्या असल्या तरी नागरिक मात्र सूचनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदरची बाब गंभीर असल्याने या ठिकाणी संरक्षणासाठी प्रशासनाने पोलिसांची नेमणूक करण्याची गरज असल्याचे मत रावसाहेब खटके यांनी व्यक्त केले. तर येथून पुढे पाऊसकाळ चांगला आहे. तसेच उरमोडीच्या पाण्याचे आवर्तन कायम सुरु राहणार असल्याने दरवर्षी राजेवाडी तलाव भरणार असून कायमस्वरूपी अडचण दूर करण्यासाठी पुलाची उंची वाढविण्यासाठी बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत माजी जि.प. सदस्य जनार्धन झिंबल यांनी व्यक्त केले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज