आटपाडी शहरातील शेटफळे चौकातील महामार्गाचे काम निकृष्ट
आरपीआयच्या राजेंद्र खरात यांचे प्रशासनाला निवेदन : रास्ता रोको चा इशारा
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरातून जाणाऱ्या आटपाडी-ते सलगरे या महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे अस्र्ल्याचा आरोप आरपीआयचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी केला असून याबाबत त्यांनी मुख्य कार्यकारी अभियंता पुणे व कार्यकारी अभियंता सावर्जनिक बांधकाम विभाग मिरज यांना निवेदन दिले असून याबाबत त्यांनी रस्ता रोकोचा इशारा दिला आहे.
आटपाडी शहरातून जाणारा पी.एन. ४१ रा.मा. क्र. १४३ आटपाडी ते सलगरे रा.मा. क्र.१५३ महामार्गाचे आटपाडी शहरातील काम निकृष्ट आहे. शहरालगत चुकीच्या पद्धतीने काम होतआहे. शेटफळ चौक येथे रस्ता क्रॉस करण्याच्या ठिकाणी गटार नाला संरक्षण भिंत फक्त एकाच बाजूला बांधली आहे. दुसऱ्या बाजूला नियमानुसार गरजेची असताना ठेकेदार व स्थानिक पीडब्ल्यूडी अधिकारी सुभाष पाटील यांनी हे काम असेच असून याबाबत आम्ही काहीही करू शकत नाही असे प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.
मुळात सदर ठिकाणी रस्त्याकडेला गटार नसल्याने काम झाल्यापासून पाणी वाहून जाण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. गटारीमध्ये माती, दगड पडून गटार वारंवार बंद होत आहे. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार खुदाई केली नाही, त्यामुळे पहिल्याच पावसाचे पाणी या नवीन महामार्गावर साचून डबके तयार झाल्याने नवीन रस्ता सुविधा ऐवजी "गैरसोयीचा बनला" आहे. मागणी आणि विनंती करूनही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. हा प्रश्न तत्काळ न सोडविल्यास दिनांक १० जुलै २०२० रोजी आटपाडी शेटफळ चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे राजेंद्र खरात म्हणाले. निवेदनाच्या प्रती तहसीलदार आटपाडी, पोलीस निरीक्षक आटपाडी यांना देण्यात आलेल्या आहेत.