1 जून पासून लॉक डाऊन उठवा ; स्वराज इंडियाच्या ललित बाबर यांची मागणी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी: कोरोना मुळे बाधित समाजाला लॉकडाऊन ने जास्त ज्यादा भयग्रस्त बनवले आहे. राष्ट्रीय लॉकडाऊनला 65 दिवस, राज्य लॉकडाऊन ला 71 दिवस पूर्ण होत आहेत. या काळात लोकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. लोकांना काम नसल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ येत असून सरकारने १ जून ते १५ जून पूर्ण लॉक डाऊन हटवण्याची मागणी स्वराज इंडियाच्या वतीने राज्य सरकारला निवेदनाद्वारे करण्यात आली असल्याची माहिती स्वराज इंडिया महाराष्ट्राचे ललित बाबर,यांनी दिली.
लॉकडाऊन मुळे करोनाची साथ ओसरेल पण अनुभव उलटा आहे. संक्रमित नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. या सर्व काळात हातावर पोट भरणारे कष्टकरी जनतेचा प्रचंड हाल सहन करावे लागले. असे असुनही जनतेने मोठे सहकार्य सरकारला दिले आहे. आता प्रश्न आहे की लॉकडाऊन किती दिवस सुरू ठेवायचा? आज सारा बाजार, उद्योग बंद आहे, लोकांच्या हातात काम नाही. म्हणून पैसेही नाहीत. या स्थितीत जगायचे कसे असा प्रश्न पडलेली जनता नाईलाजाने पायी गावाला निघालेली आहे. ते कधी परत येणार याचा काही भरवसा नाही. याचा अर्थ इतकाच की जनतेच्या हाताला काम मिळेल तेव्हाच पैसे मिळतील व त्याचवेळी त्यांचे घर संसार चालू शकतील. म्हणून 1 जून ते 15 जून पूर्ण लॉक डाऊन हटवावा. एक प्रयोग म्हणून, या काळात खालील सूट सामील करावी. राज्य अंतर्गत प्रवास करण्याची मुभा असावी. प्रायव्हेट गाडी मध्ये ड्रायव्हर व 2 व्यक्ती असाव्यात, लोकल ट्रेन मध्ये प्रत्येक बाकावर दोन व्यक्ती तर लांब पल्ल्याच्या गाडीत एकूण डब्याच्या 50% ( म्हणजे 36 प्रवासी) संख्ये प्रवास परवानगी असावी. ट्रेन सुटते त्यातून 25% व मधील स्टेशनवर उरलेले 25% प्रवासी चढू द्यावेत, ऑटो रिक्षात 1 ड्रायव्हर आणि 1 व्यक्ती, कार्यालयात 50% उपस्थिती व कार्यालय फक्त 5 तास सुरू असावे, शाळा फक्त चार तास असावी व व प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसवावा. बाजारात एक दुकानानंतर एक दुकान उघडे ठेवावे. लोकांनी लाईन लावून व्यवहार करावा. पायी चालताना तीन फुटाचे अंतर ठेवावे. जनतेने ही सूट दिली आहे त्याचा दुरुपयोग करू नये. गावातील व शहरातील व्यवहारिक जरूरीच्या गोष्टी पूर्ण करण्याकरता प्रत्येक वॉर्ड मध्ये एक लोकसमिती बनवण्याची आमची मागणी आहे. राज्यात 75 दिवसांनी व्यवहार सुरू होतील तेव्हा थोडी गर्दी वाढेल पण आवश्यक काळजी लोकांनी घ्यावी. या 15 दिवसात सर्व व्यवहारावर नजर ठेवावी. त्या अहवालाची समीक्षा करावी व सरकारने पुढील निर्णय घ्यावेत अशी ही मागणी स्वराज इंडिया महाराष्ट्रचे अध्यक्ष ललित बाबर, सचीव प्रत्युष, प्रा.ओमप्रकाश कलमे, कोषाध्यक्ष हिरामण पगार, उपाध्यक्ष वंदनाताई शिंदे, इस्माईल समडोळे, अण्णासाहेब खंदारे, सुभाष लोमटे, मानव कांबळे, शकील अहमद, आलोक कांबळे, इब्राहिम खान, संजीव साने यांनी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना ईमेल ने पाठवलेल्या निवेदनात केली आहे.