ऊस उत्पादकांना चौदा टक्के एफआरपी मिळण्यासाठी स्वाभिमानीचा संघर्ष : राजू शेट्टी
जयसिंगपूर: यंदाच्या हंगामातील उसाला एकरकमी एफआरपीचा निर्णय झाला असून, पहिली उचल विनाकपात देण्यात यावी. ऊस तोडणी वाहतुकीच्या चौदा टक्के वाढीप्रमाणे शेतकऱ्यांचा वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून एफआरपीच्या चौदा टक्क्यांप्रमाणे होणारी सरासरी दोनशे रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना संघर्ष करणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी येथे झालेल्या ऑनलाईन ऊस परिषदेत केली. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी शेतकऱ्यांच्या सहीची मोहीम राज्यभर राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जयसिंगपूर-उदगांव मार्गावरील कल्पवृक्ष गार्डनमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९ वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने झाली. गेली तीन वर्षे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याचे सांगून राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांच्या एफआरपीतून चौदा टक्के तोडणी वाहतूक वजा केली जाणार आहे. तोडणी वाहतुकीप्रमाणेच एफआरपीमध्येदेखील चौदा टक्के वाढ करावी. यात एक रुपयाही कमी घेतला जाणार नाही. त्यासाठी गोडाऊनमधून साखरेची वाहतूक होऊ देणार नाही.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्यूज