लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची पद्धत : आशिष शेलार
मुंबई : मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पेटला आहे. ठाकरे सरकारनं आरेमधीलमेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं राज्य सरकारला पाठवलं आहे. यावरून आता भाजपनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची नवी पद्धत असल्याचा टोला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला, त्यावेळीच आम्ही त्यांच्या हेतूंवर शंका उपस्थित केली होती. अहंकारी राजा आणि विलासी राजपुत्रामुळे मुंबईकरांना त्रास होत असल्याचं आम्ही म्हटलं होतं. मिठागर आयुक्तांची परवानगी घेतली होती का, असा प्रश्न आम्ही त्यावेळी विचारला होता. केंद्रानं पाठवलेल्या पत्रामुळे आमची शंका रास्त होती हे स्पष्ट झालं आहे, असं शेलार म्हणाले.
ठाकरे सरकारच्या अहंकाराचा सामना मुंबईतील जनतेला करावा लागत असल्याचं शेलार यांनी म्हटलं. प्रकल्प लटकवा, अटकवा अन् भटकवा हीच तिघाडी सरकारच्या कामाची पद्धत आहे. आधी मेट्रो कारशेड प्रकल्प लटकवण्याचा प्रयत्न झाला. दिरंगाई करण्याचे प्रयत्न केले. आता आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रांती पूर्तता न करता प्रकल्प अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबतच चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल करून त्यांना भटकवण्याचा प्रयत्नदेखील सुरू असल्याचा आरोप शेलार यांनी केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज