शुक्र ओढ्याला पूर आल्याने कालपासून आटपाडी बाजार पटांगण येथील पुल पाण्याखाली
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/धिरज प्रक्षाळे : आटपाडी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस झाल्याने आटपाडी तालुक्यातील अनके ठिकाणी गाव ओढ्यावरील पुल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून आटपाडी शहरातून वाहणाऱ्या शुक्र ओढ्याचे पाणी काल पासून पुलावर आले असून या ठिकाणची ही वाहतूक बंद असून येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या मिटकी, खरसुंडी, कामथ, घाणंद, जांभूळणी या परीसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. याभागातील असणारे तलाव अगोदर टेंभू योजनेच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी हे मोठ्या प्रमाणात वाहत आहे.
हेच पाणी पुढे आटपाडी तलावात येत असून आटपाडी तलावतून सांडव्याद्वारे हे पाणी शुक्र ओढ्यात येत असल्याने शुक्र ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. काल दिनांक १४ पासून आटपाडी शहरातील बाजार पटांगण येथील पुलावर पाणी आले असून अद्याप पर्यंत पुलावर पाणी आहे. त्यामुळे या ठिकाणहून होणारी वाहतूक बंद झाली असून नागरिकांना बायपास पुलावरून ये-जा करावी लागत असून या ठिकाणी असणाऱ्या पुलाच्या बाजूकडील ही भराव खचला असल्याने या पुलालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस