जिल्ह्यातील सर्व गावातील आठवडा बाजार सुरू करा : शंभोराज काटकर यांचे आवाहन
माणदेश एक्सप्रेस टीम
सांगली : सांगली, मिरज, कुपवाड शहरांप्रमाणे जिल्ह्यातील नगर पालिका आणि सर्व गावातील आठवडा बाजार सुरू करण्यात यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन जनसेवा फळे भाजीपाला आणि खाद्यपेय विक्रेता संघाचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी केले आहे.
श्री. काटकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, जनसेवा संघटनेच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्ह्यातील सलगरे, माधवनगर आणि बुधगाव या बरोबरच जिल्ह्यातील काही बाजार तेथील गावचे व्यापारी, शेतकरी आणि सरपंच यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी अत्यंत गतीने निर्णय घेऊन बाजार सुरू केले. त्यामुळे परिसरातील शेतमाल विक्रीची सोय झाली. जनतेला गेले सात महिने न मिळालेल्या अत्यावश्यक वस्तू सहज उपलब्ध झाल्या. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील अर्थचाके गतिमान होण्यास मदत होणार आहे.
सध्या बाजारात भाजीपाल्याची टंचाई आहे. पावसामुळे शेतमाल बाहेर काढता येत नाही. त्यामुळे दर वाढलेले आहेत. शेतकरी आपला भाजीपाला बाजारात आणून शकले तर त्यांचा आर्थिक भारही हलका होणार आहे. त्यामुळे बाजार सुरू होणे ही शहर आणि ग्रामीण भागाची गरज आहे. गावोगावच्या भाजिपला विक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरळीत करण्यासाठी दहा हजाराचे कर्ज सरकार देत आहे. त्यामुळे हे व्यापारीही पुन्हा उभे राहणार आहेत.
याचा विचार करून मोठ्या नगर पालिका नगर पंचायती आणि ग्राम पंचायतीने तातडीने बाजार सुरू करावेत. कर्जासाठी भाजीपाला विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी संघटनेशी 9970555570 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी केले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज