एमपीएससी २०१८ बॅचच्या ३८७ पोलिस उपनिरीक्षकांना त्वरीत प्रशिक्षणासाठी पाठवा ; राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्याने केली मुख्यमंत्र्याकडे मागणी
माणदेश एक्सप्रेस टीम
आटपाडी/प्रतिनिधी : एमपीएससी द्वारे निवड झालेल्या २०१८ बॅच च्या ३८७ पोलिस उपनिरीक्षकांची वैद्यकीय चाचणी व कागदपत्रे पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करून प्रशिक्षणासाठी पाठवीत कोरोणाच्या संकट काळात सेवेत सामावून घेत सामाजीक सेवा करण्याची संधी त्यांना द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिलजी देशमुख, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, गृह राज्यमंत्री ( शहरे ) सतेज डी. पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई यांना पाठविलेल्या ईमेल निवेदनाद्वारे सादिक खाटीक यांनी ही मागणी केली आहे.
एमपीएससी द्वारे २०१८ साली झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल १७ मार्च २०२० रोजी एमपीएससी आयोगाने जाहीर केला . या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची पूर्व परीक्षा १३ मे २०१८ रोजी , मुख्य परीक्षा २६ ऑगस्ट २०१८ रोजी आणि शारीरीक चाचणी आणि मुलाखत कार्यक्रम नोव्हेंबर २०१९ ते जानेवारी २०२० दरम्यान झाली . त्यामध्ये ३८७ उमेदवारांची अंतिमतः निवड झालेली आहे. निकाल लागून ६ महिने उलटून गेल्यानंतर २१ जुलै २०२० रोजी उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे साक्षांकन नमुने पाठवण्यात आले होते , उमेदवारांनी त्याची तात्काळ पूर्तता करून मंत्रालय मुंबई येथे पोल ५ ए या संबंधित विभागास ते सादर केलेले आहेत . त्यानंतर दोन महीने होऊन सुध्दा त्यावर अद्याप कोणतीही प्रक्रिया झालेली नाही.
त्यामुळे सदर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी व कागदपत्र पडताळणी याबाबत अजुन कोणतीच या निवड झालेल्यांना सूचना प्राप्त झालेली नाही , तरी लवकरात लवकर ही प्रक्रिया पार पाडून त्यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे .वैधानिक पद्धतीने रीतसर परीक्षा देऊन पोलिस उपनिरीक्षक झालेल्या २०१८ च्या ३८७ उमेदवारांना आता निकालानंतर जॉइनिंग साठी प्रतीक्षेत ठेवू नये अशी प्रांजळ भावना असल्याचे स्पष्ट करून सादिक खाटीक यांनी, सध्या आपले महाराष्ट्र राज्य कोरोनाच्या संकटाचा अत्यंत प्रभावीपणे सामना करीत आहे याची सर्वांना पूर्णतः जाणीव आहे.अशा बिकट परिस्थितीमध्ये या निवड झालेल्या तरुणांना पोलीस दलामध्ये सामावून घेऊन, त्या अनुषंगाने सामाजिक सेवा करण्याची संधी देण्यात यावी. अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान १ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री महोदयांच्या दालनातल्या जनता दरबारात ही या मागणीचे पत्र संबधीत निवड झालेल्या काही विद्यार्थ्यांनी मंत्री महोदयांना दिले असल्याचे सादिक खाटीक यांनी शेवटी म्हटले आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज