महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ : केंद्र सरकारचा सावध राहण्याचा इशारा
मुंबई : सलग 5 आठवड्यांपासून देशातला कोरोनाचा आलेख घसरणीला लागला आहे. त्यामुळे अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू अनेक गोष्टींना संमती देण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचा दर म्हणजे रिकव्हरी रेटदेखील 90.62 वर गेला आहे. असे असले तरी देशातील कोरोनाची आकडेवारी दिलासादायक असली तरी महाराष्ट्राचा धोका मात्र पुन्हा वाढला आहे. सणासुदींच्या काळात महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे, याबाबत केंद्र सरकारने सावध केलं आहे आणि कोरोनाशी लढण्याची रणनीती बदलण्याची गरज असल्याचंही म्हटलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी देशातील कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात 5 राज्यांमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि दिल्लीचा समावेश आहे.