म्हसवड शहराला होणाऱ्या दुषित पाणी पुरवठ्याबाबतची तातडीने चौकशी व्हावी : प्रा.विश्वभंर बाबर
माणदेश एक्सप्रेस टीम
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड नगरपालिकेतर्फे होणाऱ्या दुषित पाणीपुरवठ्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून या बाबत तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी प्रा.विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात प्रा.बाबर यांनी म्हटले आहे की, शनिवार दि १० रोजी सकाळी शिक्षक कॉलनी म्हसवड व काळापट्टा तसेच नजिकच्या परिसराला पिण्याचे पाणी नगरपालिकेतर्फे सोडण्यात आले होते. सदर पाण्यात शेवाळ व तत्सम घाण मोठ्या प्रमाणात होती. पाणी गाळण्यासाठी वापरण्यात येणारे फडके पाच मिनिटात शेवाळ व तत्सम पदार्थामुळे घट्ट होउन त्यातून पाणी खाली येऊ शकत नव्हते. त्याबाबत तातडीने पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना बोलावून हि बाब त्यांना दाखवून दिली.
सध्याच्या कोरोना महामारी कालावधित दुषित पाणीपुरवठा झाल्यास रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार आहे. रोगराई वाढण्याची भिती असून सर्दी, ताप व साथीचे रोग वाढल्यास लोकांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येण्याची भिती आहे तसे झाल्यास रहिवाशांना विविध आरोग्य विषयक समस्याना सामोरे जावे लागणार आहे व त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
पाणीपुरवठा नळातून शेवाळ व इतर पदार्थ येणे म्हणजे पाणीपुरवठा योजनेत गोलमाल असल्याचे स्पष्ट होत आहे. मुळ पाणी पुरवठा टाकी स्वच्छ नसणे, लिकेज तसेच कारखेल हद्दीतील साठवण पाणीपुरवठा ठिकाणाच्या यंत्रणेतील अस्वच्छता कारणीभूत असण्याची शक्यता आहे. सध्याच्या कोरोना कालावधीत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणेसाठी सदर दुषित पाणीपुरवठ्याची तातडीने चौकशी करावी व जनतेला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे अशी विनंती करण्यात आली असून निवेदनाच्या म्हसवड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज