कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा : बच्चू कडू
अमरावती - कांद्याच्या वाढलेल्या भावांमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सर्वसामान्यांच्या खिशाला अजूनच कात्री लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले कांद्याचे भाव परतीच्या पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर मोठ्याने भडकले आहेत. घाऊक आणि किरकोळ बाजारात कांद्याचे दर शंभर रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. या परिस्थितीत दर वाढले म्हणून बोंबलू नका, जर कांदा परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा, असा सल्ला राज्य सरकारमधील मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.
कांद्याचा भाव वाढण्यामागचं कारण सांगताना बच्चू कडू म्हणाले की, केंद्र सरकारने इराणमधून कांदा आयात केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. मात्र कांद्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाने ओरडू नये. कांद्याचे भाव वाढले पाहिजेत कारण ७० वर्षांचा अनुशेष बाकी आहे. ज्यांना कांदा परवडत नसेल, त्यांनी मुळा, लसूण खावी, असा सल्लाही बच्चू कडू यांनी दिला.