पंढरपुरात पूरजन्य परिस्थिती : नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
सोलापूर : चंद्रभागा नदीत येणारा पाण्याचा विसर्ग पाहता शहरातील अनेक भागात पुराचे पाणी जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. पंढरपूरला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुधवारी कुंभार घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला होता. या सततच्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे म्हणूनच प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पंढरपूरकडे येणारे सातारा, पुणे सोलापूर, मंगळवेढा या ठिकाणची वाहतूक बंद केली दरम्यान, सततच्या पावासामुळे ओढे, नाले भरून वाहिले. त्यातच उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, याचा परिणाम पंढरपूर शहर आणि नदीकाठच्या गावांवर झाला आहे़. दरम्यान, दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या अनेक नद्यांना प्रमाणापेक्षा पाणी आले आहे, त्यामुळे पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे.
अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढावली आहे. शहरातील नदीकाठच्या कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे़. ग्रामीण भागात देखील नागरिकांना स्थलांतरीत केले आहे. उजनीतून भीमानदीत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे़ पुरातील लोकांना वाचविण्यासाठी व सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफची टीम सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहे़. पुरामुळे नद्या काठच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरूच आहेत.