मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक : पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा
पंढरपूर : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलाच आक्रमक झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. सर्व आंदोलक 20 दिवसांचा पायी प्रवास करत मंत्रालयावर धडक देणार आहेत. सरकारला हा मोर्चा महागात पडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.
यापूर्वी तुळजापूरमध्ये मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सरकारला त्यावेळी 15 दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आले होते. त्याला 21 दिवस उलटून गेले तरीही सरकारकडून कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आला नसल्यामुळे 7 नोव्हेंबरला पंढरपूर ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले. हा मोर्चा एकूण २० दिवस असणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसह अनेक मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज