पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या पिकात ; लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : सांगोला तालुक्यातील अजनाळे परिसरामध्ये गेल्या दोन-तीन वर्षापासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र गेल्या दोन-तीन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसाने डाळिंब बागा, ढोबळी मिरची पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान झालेल्या डाळिंब बागेची तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील शेतकऱ्याकडून केली जात आहे.
मुसळधार पावसाने गाव ओढ दुतर्फा भरून वाहू लागला आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक बंद झाली. अजनाळे व आसपासच्या परिसरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याने गावातील ओढा, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत ओढ्याच्या पात्रा बाहेर पाणी आल्यामुळे गावालगत असणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे या मार्गावरील काही काळ वाहतूक बंद झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. तीन वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर यावर्षी मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. गावातील डाळिंब बागेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी डाळींब बागा वाहून गेल्या आहेत.
अनेक शेतकऱ्यांच्या ढोबळी मिरची पिकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे हातातोंडाशी आलेले पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेल्या शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून जोपासलेल्या डाळींब बागा उध्वस्त झाल्या असून त्यामुळे शेतकरी राजा आर्थिक संकटात सापडला आहे.
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे डाळिंब बागेमध्ये कळीची सेटिंग होत नसल्याने तर काही ठिकाणी कळी गळून पडत आहे. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते, औषधे यावर हजारो रुपये खर्च करून डाळींब बागेचा बहार धरला मात्र सततच्या पडणाऱ्या पावसामुळे डाळिंब बागेची अवस्था दयनीय झाली आहे. गावातील काही घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. वरील सर्व घटनेची पाहणी करून तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी गावातील शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज