मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडलं; 'या' काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर
नागपुर: पूर्व विदर्भात पुराचे तांडव निर्माण झाल्याने शेकडो लोकांचे संसार नेस्तनाबूत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडलं आहे, अशा शब्दांत आशिष देशमुख यांनी आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
आशिष देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. मात्र, पूरामुळे हजारो लोक देशोधडीला लागले आहेत. संसार नेस्तनाबूत झाले आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी करायला हवी होती.
पण अजूनही ते विदर्भाकडे फिरकलेले नाहीत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विदर्भात अजूनही पाहणी दौरा केलेला नाही, असं देशमुख म्हणाले. राज्यात इतर शहरांप्रमाणेच नागपुरातही करोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढलेला आहे. पण आरोग्य मंत्री राजेश टोपे अजूनही नागपूरकडे फिरकलेले नाहीत. टोपे नेमके कुठे आहेत?, असा सवालही त्यांनी केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज