मुख्यमंत्री ठाकरे यांचे मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन ; न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध
मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्यभरात मराठा संघटनांनी आंदोलनं पुकारली आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या संबोधनात भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांनी मराठा बांधवांना आंदोलन न करण्याचं आवाहन केलं आहे. तुमची बाजू सरकार आक्रमकपणे मांडत आहे, जेष्ठ विधीज्ञांसोबत चर्चा करत आहोत. तुम्ही आंदोलने जरूर करा परंतु कोणाच्या विरोधात? सरकार तर तुमच्यासोबतच आहे. आंदोलनांची आवश्यकता नाही कारण तुम्हाला न्याय मिळवून देण्यास सरकार वचनबद्ध आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विरोधी पक्ष नेत्यांसोबतही मी आज बोललो आहे. ते बिहारला आहेत. ते देखील म्हणाले आहेत की आम्ही सरकारसोबत आहोत. मोठ्या बेन्चकडे जायला परवानगी दिली त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. अनाकलनीय पद्धतीने आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्थगिती दिली आहे. त्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. ज्येष्ठ विधीतज्ञांसमवेत चर्चा करून सर्वोत्तम वकील दिले आहेत, असं ते म्हणाले.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई आपण एकत्र लढलो. सर्वपक्षीय एकत्र लढलो. पूर्वीच्या सरकारचे कोणतेही वकील बदलले नाहीत, उलट अधिक वकील दिले. कोर्टात आर्ग्युमेन्ट करायला कमी पडलो नाही, असंही ते म्हणाले.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस