अर्णब गोस्वामींवर तातडीनं कारवाई करा : खासदार अरविंद सावंत यांची मागणी
मुंबई : बातमीदारीच्या नावाखाली बेजबाबदार बातम्या प्रसारित करणारे व महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांवर कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट आरोप करणारे 'रिपब्लिक टीव्ही' या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर तातडीनं कारवाई करा, अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
अरविंद सावंत यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना या संदर्भात एक सविस्तर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी केल्या आहेत. गोस्वामी यांनी पत्रकारितेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एका मृत महिलेवरही त्यांनी आरोप केले आहेत. तिचे चारित्र्यहनन केले आहे. संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी आक्षेप घेतल्यानंतरही अर्णब गोस्वामी बधले नाहीत.
प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने पत्रकारिता व बातम्यांसंदर्भात घालून दिलेल्या मर्यादांचेही ते उल्लंघन करत आहेत. काही लोकांच्या स्वार्थासाठी बेजबाबदार बातम्या प्रसारित करून गोस्वामी हे समाजात तेढ निर्माण करीत आहेत. त्यामुळं राज्यात कायदा-सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे,' असं सावंत यांनी पत्रात म्हटलं आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज