कार आणि सरकारची विरोधकांनी चिंता करू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : कार आणि सरकार दोन्हीही आपापले काम व्यवस्थित करत असल्याने विरोधकांनी त्याची चिंता करू नये असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कायर्क्रमात ते बोलत होते.
सध्या राज्य सरकारबद्दल ज्यावेळी चर्चा होते. त्यावेळी नेहमी या सरकारचं स्टेअरिंग कोणाच्या हाती आहे, याबाबत सर्वाधिक चर्चा रंगलेल्या दिसतात. तुम्हाला काय वाटतं स्टेअरिंग कोणाच्या हातात आहे. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, कार आणि सरकार दोन्हीही सुरळीत सुरु आहे. आम्ही सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत असे ते म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाविषयी उद्धव ठाकरे म्हणाले, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. ज्यांच्याकडे याविषयी काही माहिती असेल किंवा काही पुरावे असतील त्यांनी मुंबई पोलिसांना येऊन द्यावे. महाराष्ट्र पोलिस हे प्रकरण हातळण्यास सक्षम आहे. ज्यांचा महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीवर विश्वास नाही त्यांना पोलिसांवर आरोप करण्याचा काहीच अधिकार नाही. याच पोलिसांच्या आधारावर माजी मुख्यमंत्र्यांनी पाच वर्ष सत्ता केली होती,हे विसरू नये.
महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहोत. आमचं नातं टिकेल नाही टिकेल याची कुणी चिंता करु नये. भाजपासोबत आमचा घटस्फोट झाला. त्याची कारणं सगळ्यांना माहिती आहेत. शिवसेना 30 वर्ष भाजपासोबत होती. त्यावेळी त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला नाही. मात्र आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्याविरोधात एवढी वर्ष लढलो त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. महाविकास आघाडीचं सरकारला कोणताही धोका नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.