राज्यातील कृषी खाते झोपले आहे का? बोगस बियाणावरून राज्यमंत्री बच्चू कडू आक्रमक
मुंबई: बोगस बियाणांमुळे हाताशी आलेलं पीक गेल्यानं शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सोयाबीनची शेती करणाऱ्यांना बोगस बियाण्यांचा मोठा फटका बसला आहे. त्यावरून राज्यमंत्री बच्चू कडूंनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खातं झोपलंय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे सुरू असून शेतकऱ्यांना लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती बच्चू कडूंनी दिली. 'पंचनामे करण्याचं काम सुरू आहेत. तहसीलदार, तालुका कृषी जिल्हाधिकारीदेखील सोबत आहेत. शेतीची सार्वत्रिक तपासणी करण्यात येईल. बियाणामुळे रोग पडला की वातावरणात काही रोग आहे, हे तपासलं जाईल. पंचनामे होतील. ज्यांनी विमा काढलाय, त्यांना विम्याचे पैसे मिळतील. बाकीच्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाईल,' असं कडू म्हणाले.
'सोयाबीन पिकवणारा शेतकरी यंदा पूर्णपणे घायाळ करून टाकला आहे. पेरलं तेव्हा निघालं नाही आणि पीक हातात आलं तेव्हा मारून टाकलं. राज्यातलं कृषी खातं झोपलंय की काय अशी स्थिती आहे.
जेव्हा बियाणांचं प्रमाणीकरण होतं, त्यावेळी काही बदमाशी होते का, असा प्रश्न मला पडतो. महाबीजनं बाजारातलं बियाणं घेतलं असा माझा स्पष्ट आरोप आहे. बाजारातून सर्वात निकृष्ट बियाणं २-३ हजार रुपये क्विंटल दरानं खरेदी करून ८ हजार रुपये क्विंटल दरानं विकलं,' असा गंभीर आरोप त्यांनी केला.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज